शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग २


नमस्कार मित्रांनो!!!
आयुष्यचं GPS ज्योतिषशास्त्रच्या भाग १ मध्ये आपण बघितले की कशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्याला मार्ग दाखवून आपलं आयुष्य सोयिस्कर करू शकते. आता आपण ज्योतिषशास्त्राचे अजून काही फायदे बघूयात!
आरोग्याच्या तक्रारी या आयुष्यभर सुरू असतात. तारुण्याच्या धुंदीत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोही, पण शरीराला कधीतरी त्याचा सोस जाणवतोच. मग असलेला पैसा, ज्ञान या सर्व गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. आरोग्य हीच एकमेव संपत्ती असल्याची जाणीव होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण जर आपल्याला आधीच अंदाज असेल की आपल्याला आरोग्याच्या बाबतीत कोणत्या समस्या उद्भवू शकतात तर? ही आयुष्यात किती मोठं वरदान ठरेल! ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तिला शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित त्रास होऊ शकतो याबाबत माहिती मिळवू शकतो. म्हणजे, कोणत्या व्यक्तिला किडनी संबंधित विकार होऊ शकतात, हृदय, पोट असे विकार होऊ शकतात असे संकेत मिळवू शकतो. तसं जर असेल तर ती व्यक्ति त्याबाबतीत आधीच जागरूकता ठेऊन तो आजार होण्यापासून स्वतःला वाचवू शकते.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कुटुंबियांची आणि मित्रपरिवारची साथ आवश्यक असते. कधी संकटसमयी आधार म्हणून तर सुखाच्या क्षणात सोबती म्हणून आपल्याला माणसे हवी असतात. आपल्या माणसांशी जोडून राहणं, नातेसंबध टिकवणे हे फार महत्वाचं असतं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण याकडे नकळतपणे दुर्लक्ष करत असतो. कधी-कधी विनाकारण गैरसमज करून घेऊन किंवा रागाच्या भरात दुखावली जातात. हे टाळणे आवश्यक असते. पत्रिकेत अशी काही ग्रहस्थिती निर्माण होते जेणेकरून असे प्रसंग उद्भवतात. आपल्याला जर आधीच अशा अपघाताच्या वेळेची माहिती असेल तर सय्यमाने वागू शकतो. खासकरून लग्न हा प्रसंग आहे ज्यावेळी दोन कुटुंब एकमेकांशी जोडले जात असतात. अशा वेळेस ज्योतिषशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकतं. लग्नंनातरही बर्‍याचदा पती-पत्नी संबंधात दुरावा निर्माण होतो. त्याचा परिणाम हा पूर्ण कुटुंबावर होत असतो. चूक कोणाचीही नसते पण केवळ परिस्थितिची देण म्हणून कुटुंब विभक्त होतात. जर यावर वेळीच उपाय केले आणि मनातील जळमटं साफ झाली तर कुटुंबातील वाद थांबवता येतात. या बाबतीत ज्योतिषशास्त्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतं.
        आपण आयुष्याच्या या सर्व बाबींमध्ये ज्योतिषशास्त्र एखाद्या GPS प्रमाणे मार्गदर्शक म्हणून काम करू शकतं हे पाहिलं. पण हे साध्य कसं करता येतं याबाबत अनेकांना अनेक प्रश्न असतात. कदाचित काही अतिरेकी कथा ऐकल्याने यावरचा अतिविश्वास किंवा अविश्वास त्यांना वेगळ्या निष्कर्षापर्यन्त पोचवू शकतो. पण ज्योतिषशास्त्रात पत्रिकेचा आणि त्यातील ग्रहस्थितीचा अभ्यास केलेला असतो. प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक स्वभावधर्म आहे. तो पत्रिकेतील कोणत्या स्थानी असतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. कधी शुक्र तुमच्या करियरबद्दल सांगतो तर कधी गुरु ग्रह तुमच्या यशाचा कारक बनतो. कधी शनि महाराज तुम्हाला अडथळा बनत असतात तर कधी राहू-केतू तुमच्या वाईट स्थितीला जबाबदार असतात. या सर्व बाबतीत अनेक वर्षांचा अभ्यास बोलत असतो. जसं अवकाशात असलेला सॅटेलाइट पृथ्वीवर असलेल्या एका माणसाला योग्य रस्ता दाखवू शकतो तसाच एक ग्रह माणसाला चांगलं-वाईट फळ देऊ शकतो. येथे निरीक्षण आणि निष्कर्ष महत्वाचा ठरतो. आयुष्याचा दीर्घ प्रवास करत असताना आपल्याला जे शोधायचं आहे तेथे ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी किंवा कधी हरवलेपणाची स्थिती निर्माण झाली तर तेथेही ज्योतिषशास्त्र तुमची निश्चित मदत करू शकतं.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग १


आजचा युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. मानवाने जशी जशी प्रगती केली त्यामध्ये तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाने सामान्य माणसाचं आयुष्यही बदलून गेलं. ज्यावेळी विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाचं आयुष्य सोपं करण्यात होऊ लागतो तेंव्हा समाज व्यापक दृष्टीने परिपूर्ण होत जातो. मानवाच्या अशाच एका शोधापैकी एक आहे GPS! म्हणजे Global Positioning System! एक अशी यंत्रणा जी माणसाला दिशादर्शक ठरते. याचा वापर आपण अनेकदा केला आहे. गावाला जाताना रस्ता शोधण्यासाठी असेल किंवा गावातच एखादा पत्ता शोधत असताना आपण अगदी सहजरीत्या मोबाइल काढतो आणि त्यात मार्ग शोधतो. त्यात आपल्या आजूबाजूचा परिसर दिसतो, आपण सध्या कुठे आहोत याचं अवलोकन होतं आणि आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी सहज सोपा मार्ग कोणता हेही दिसतं. एकंदरीत, आपल्या लक्षापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळतं. या घटनेत आपण त्या यंत्राचे, त्या संशोधनाचे केवळ एकतर्फी उपभोगते असतो. आपण ना त्याचा निर्माण केला आहे किंवा त्यामागील विज्ञानही आपल्याला माहीत नसतं. पण त्यावर अंधपणे विश्वास ठेवत आपण त्याचा सल्ला ऐकतो. असं असलं तरी त्यामागे एक प्रक्रिया असते आणि अनेक शास्त्रज्ञांचा, इंजीनियरचा सहभाग असतो. सॅटेलाइट निर्माण करून तो अवकाशात सोडणे आणि त्यानुसार पृथ्वीवरील सर्व Geographical परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं.
ज्याप्रमाणे GPS हे आपल्या भौगोलिक सद्यस्थितीची माहिती देत असतं, योग्य दिशादर्शक असतं त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे आपल्या आयुष्यात एक दिशादर्शक म्हणून काम करू शकतं. प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या तपस्येनंतर आणि आधुनिक काळातील संशोधकांच्या अभ्यासानंतर ज्योतिषशास्त्र आज एक परिपूर्ण शास्त्र म्हणून आपल्यासमोर एक मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे. आपला जन्म जरी आपल्या हातात नसला तरी आपलं आयुष्य कसं असावं याबद्दल आपला अट्टहास उपयोगी पडू शकतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पाच महत्वाच्या गोष्टी असतात ज्यापासून सुख मिळावं अशी त्याची अपेक्षा असत. त्यापैकी आयुष्यात सर्वात आधी येतं ते शिक्षण! त्यानंतर आरोग्य! मग धनसंपत्ती. त्यानंतर घर. आणि या सगळ्यात महत्वाचं असतं ते कुटुंब व कौटुंबिक नातेसंबंध!
ज्योतिषशास्त्रात या सर्व बाबतील उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं. ज्योतिषशास्त्र तुम्हाला तंतोतंत भविष्य सांगत नाही आणि तशी अपेक्षाही कोणी ठेऊ नये. कारण आपली कर्मचं आपलं भविष्य ठरवत असतात. पण ज्योतिषशास्त्र आपल्याला समाधानी आयुष्याचे मार्ग दाखवू शकतं. कोणत्या मार्गावर खाचखळगे आहेत, कुठे आपण सावध असलं पाहिजे, कुठे सुसाट वेगाने धावलं पाहिजे, कधी विश्रांती घेतली पाहिजे, कुठे काळजी घेतली पाहिजे या सर्वांची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्रातून मिळू शकते.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष सुरू होतो तो शिक्षणापासून! आपल्याकडे लहानपणापासून शिक्षणाच्या बाबतीत दबाव पाहायला मिळतो. पण शिक्षण हे असं क्षेत्र आहे जेथे आवडीतून निवड झाली तर त्यात प्रचंड यश मिळू शकतं. आपण असे अनेक मुलं-मुली बघतो जे सर्व सोयीसुविधा असूनही त्यातून त्यांना शिक्षणात यश मिळत नाही. कारण त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण मिळत नसल्याने त्यांचा त्यात रसच नसतो. जर त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला आणि त्यांचा रस, आवड, गती कशात आहे हे जर समजलं तर त्यांना योग्य वेळी योग्य शिक्षण देण्याची सोय करता येते. आपल्या शिक्षणावरच आपलं भवितव्य घडत असतं. त्याच्याबद्दल जर योग्य दिशा समजली तर संपूर्ण आयुष्यात त्याचा मोठा फायदा होतो.
शिक्षणानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तो पैसा! पैसा ही आजच्या काळाची गरज आहे असं म्हणता येईल. कारण पैसा असेल तरच तुम्हाला समाजात प्रतिष्ठा असते आणि आणि सुखवस्तू आयुष्य जगता येतं. पण पैसा प्रत्येकाच्या नशिबी नसतो. कितीही मेहनत केली तरी त्यात यश येत नाही. असं अनेकांसोबत होत असतं. याचा जर व्यवस्थित विचार केला तर यातूनही सुटका मिळवता येते. ग्रहांची पत्रिकेतील स्थिति पाहून योग्य वेळ आणि संधीची माहिती मिळाली तर यश मिळवणे अशक्य नाही. अर्थात, त्यासाठी मेहनत आवश्यक आहेच. पण कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल ज्योतिषशास्त्र आपल्याला फायदेशीर ठरू शकतं.
प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं. स्वतःचं घर असावं! समाधानी आयुष्य जगत असताना स्वतःचं संपन्न घर असणं आवश्यक मानलं जातं. शिवाय ते घर वास्तुशास्त्राला अनुसरून असेल तर आयुष्य समाधानाने जगणं शक्य होतं. पण अनेकांना वास्तुसुख नसतं. काहींकडे पैसा नसल्याने घर घेणं शक्य होत नाही तर काहींकडे पैसा असूनही चांगली वास्तु मिळत नाही. चांगल्या वास्तुचा योग जुळून आला पाहिजे असं म्हणतात. ज्योतिषशास्त्र या बाबतीतही पूर्ण समाधान करू शकतं. कुंडलीत वास्तुयोग केंव्हा आहे याचा अभ्यास करून त्या काळात चांगल्या वास्तुसाठी प्रयत्न केले तर ती मिळतेच मिळते! येथेही ज्योतिषशास्त्र आपल्याला GPS प्रणाली प्रमाणे आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते.  


सोमवार, ६ एप्रिल, २०२०

लॉक डाउन, आपली वास्तू आणि घ्यावयाची काळजी


मित्रांनो, सध्या कोरोना विषाणूचा उत्पात सुरू असल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात Lockdown ची अंमलबजावणी केली जात आहे. पुढील एक महिना तरी आपल्या सर्वांना आपल्या वास्तुतच बंदिस्त होऊन रहावं लागणार आहे. गेल्या अनेक ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेत आलो आहोत की वास्तू ही त्या वास्तूत राहणाऱ्या सर्वांवर परिणाम करत असते. आता तर आपल्याला त्याच वास्तूत सलग रहायचं आहे. याच निमित्ताने आज आपण काही वास्तू टिप्स जाणून घेऊया जेणेकरून आपली वास्तू दोषमुक्त होण्यास मदत होईल. छोटे-छोटे बदल करून आपण अनेक आजारांना उंबरठ्याबाहेर ठेऊ शकतो आणि सध्या जे "Work From Home" करत आहोत त्यातही कार्यक्षमपणे यशस्वी होऊ शकतो.

सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत.

घरातील जी अडगळ आहे त्यापासून मुक्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असतं. जर घराच्या आग्नेय किंवा ईशान्येकडील कोपऱ्यात अडगळ असेल तर तातडीने ती मोकळी करावी. त्याची जागा घराच्या नैऋत्येस आहे.

घरात सकाळचा सूर्यप्रकाश येणे फार आवश्यक असते. त्यामुळे पूर्वेकडील दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवाव्या. दक्षिणेकडे असलेले दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्यात. उत्तरेकडील खिडकी, दरवाजे उघडे ठेवणेही उपयुक्त ठरते. एकंदरीत, घरात स्वच्छ व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी हवा खेळती राहिली पाहिजे यासाठी हे प्रयत्न असतील.

रोगाशी लढायचं असेल तर आपली प्रतिकारशक्ती वाढवणेही गरजेचे आहे. त्यासाठी नित्यनेमाने सकाळी पूर्वेकडे तोंड करून प्राणायाम व योगासने करावीत. याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.

घरातील जेष्ठ व्यक्तींची अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे असते. घरातील जेष्ठांची झोपण्याची जागा ही शक्यतो उत्तर-पश्चिम दिशेने असणे आवश्यक आहे. त्यांना इमारतीच्या पीलरजवळ, जिना किंवा बीम अशा रचनेखाली झोपू अथवा बसू देऊ नये.

रात्री झोपत असताना दक्षिणेकडे डोकं करून झोपण्याचा सल्ला आपले वाडवडील आधीपासूनच देत असतात. वास्तुशास्त्रात याचंही शास्त्रीय विवेचन करण्यात आले आहे. असं केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य राहतं, झोप चांगली लागते व दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते.

वास्तूतील आग्नेय व ईशान्य दिशा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आग्नेय ही अग्नीची दिशा आहे तर ईशान्य ही जलतत्वाशी बांधील आहे. ईशान्येकडील खोलीत झोपणे, काम करणे सर्वथा टाळावे. आग्नेय दिशेस जर तुपाचा दिवा प्रज्वलित केला किंवा कापूर वडी लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. जर हे दोन तत्व असंतुलित असतील तर आरोग्य समस्या वाढू शकतात. त्यामुळे वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन यावर उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरेल.

याशिवाय घरात बांबूचे रोप आणून ठेवणेही फायद्याचे ठरते ज्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. तुळशीचे रोप हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. वास्तुशास्त्रात त्याचेही संदर्भ आढळतात. घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कृष्णतुळस असावी.

घरातील हवा शुद्ध राहावी आणि घराचे निर्जंतुकीकरण व्हावे यासाठी घरच्या आग्नेय कोपर्‍यात तुपाचा दिवा लावला तर फायदा होऊ शकतो. याशिवाय, कापूर प्रज्वलन हेसुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो.

जी मंडळी सध्या घरात बसून काम करत आहेत त्यांनी उत्तर दिशेकडे तोंड करून काम करावे. घराच्या वायव्य कोपऱ्यात बसून काम केले तर अजून फायदा होऊ शकतो.

जी मंडळी Work From Home करत आहेत त्यांना स्वतःची मनस्थिती जपणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशात बसून काम करणे उत्तम होईल. त्यासोबत उत्तर व पूर्व दिशेला असलेला दरवाजा, खिडकी उघडी ठेऊन काम करावे.

वास्तुशास्त्रात आरोग्यसंपदा व अर्थसंपदा याबाबत सखोल माहिती दिली आहे. त्याचे योग्य अनुकरण केले तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवून आणता येऊ शकतो. येथे केवळ वास्तुशास्त्रात नमूद असलेल्या टिप्स आहेत. वास्तुशास्त्रात यापेक्षा अजून बरेच उपाययोजना आहेत ज्यांचं अनुकरण केलं तर त्याचा मोठा लाभ आपल्याला होऊ शकतो. पण त्यासाठी वास्तूशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.





शनिवार, २१ मार्च, २०२०

वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र यामुळे आपल्या जीवनात होणारे फायदे


ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.
गायत्री मंत्राच्या या ओळी आयुष्याला मार्ग दाखवणार्‍या आहेत. याच प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल आयुष्य सुकर करते!

आजपर्यंत विविध ब्लॉगच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली. कुठल्याही शास्त्राचीउत्पत्तिहीमानवी जीवनाला सुरक्षिततेकडे व संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठीच झालेली असते. आपण ज्या शास्त्रांच्या संदर्भात चर्चा केली त्यांच्यातसुद्धा हाच समान दुवा आहे. या सर्व शास्त्रांच्या सहाय्याने आपण सुरक्षित वसंपन्न आयुष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो!
मनुष्यप्राणी दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो, शिक्षण घेत असतो,नोकरी-व्यवसाय करत असतो ते आपल्यासह आपल्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच. भविष्याची चिंता ही माणसाला फार पूर्वीपासूनच सतावत आली आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच हा सारा अट्टहास सुरू आहे. या स्पर्धेच्या जगात आणि अस्तित्व टिकवण्यासाठीच नव्हे तर दाखवून देण्याच्या काळात वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र हे सर्व आपल्या फायद्याचेच ठरत असतात. प्रत्येकाची स्वप्नं सारखी नसतात आणि सुखाची व्याख्याही सारखी नसते. कोणासाठी पैसा महत्वाचा असतो, कोणासाठी ज्ञान, कोणासाठी नातेसंबंध तर कोणासाठी छंद! ती स्वप्नं पूर्ण करून समाधानाने जगण्यासाठीच त्याची धडपड सुरू असते. जन्म आणि मृत्यू मानवाच्या हातात नसतात पण त्यादरम्यानचा जीवनाचा प्रवास मात्र माणूस स्वतःची ही स्वप्नं पूर्ण करण्यात मग्न असतो. या सगळ्यात वरील सर्व शास्त्र कशा पद्धतीने प्रभावीपणे भूमिका बजावू शकतात ते जाणून घेऊ!
आपल्या जन्मानुसार आपली जन्मपत्रिका बनते आणि त्यानुसार ज्योतिषशास्त्र आपल्याला आयुष्यातील विविध टप्प्यावर मार्गदर्शन करत असतं. आपलं जेंव्हा नाव ठेवलं जातं त्याच्या अनुसार आपल्याला अंकशास्त्रतून मार्गदर्शन मिळवता येतं. माणूस ज्या वास्तूत राहतो त्यानुसार वास्तुशास्त्रचा अभ्यास करून त्याला विविध समस्यांची सोडवणूक करता येते. माणसाचा स्वभाव जसा असतो त्यानुसार त्याला यश-अपयश मिळत असतं. जर स्वभावातील दोष कमी करून गुणांची वारंवारता वाढवायची असेल तर रत्नशास्त्राचा मोठा आधार आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतलेलं प्रत्येक शास्त्र आपल्याला उपयुक्तच ठरत असतं.

          आपण या सर्व शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली आहे. या प्राचीन शास्त्रांचा योग्य उपयोग करून घेतला तर आपल्याला आयुष्यातील अनेक कटू प्रसंग टाळता येतात आणि समाधानाने जीवन जगण्यास मदत होते. आयुष्यात अनेक अशा घटना असतात ज्याला नेमकी कारण काय आहेत याचं स्पष्टीकरण मिळत नसतं. मग ते आरोग्य, धन यांची प्राप्ती न होणं असेल किंवा त्याचा क्षय होणं असेल. शिक्षण व करियरमध्ये मार्ग न सापडणे असेल किंवा वाट सापडूनही यश न मिळणे असेल. विवाह, संतती, कौटुंबिक नातेसंबंध या नाजुक बाबीही विनाकारण क्लेशदायक ठरत असतात. हे आपल्यासोबतच का होतं? याचं उत्तर सापडत नसल्याने नैराश्य येऊ शकतं आणि आयुष्य चुकीच्या दिशेने भरकटत जाऊ शकतं. आयुष्याच्या अशा अंधारलेल्या वाटेवरून जात असताना या सर्व प्राचीन विद्या आपल्याला प्रकाशवाट दाखवू शकतात. सावध वाटचाल करणे नेहमीच फायद्याचे ठरते. प्रश्न कुठलेही असोत, त्यावर उत्तरं असतातच. आपल्याला योग्य निर्णय घेऊन त्यातून मार्ग शोधावा लागतो. मुख्य म्हणजे या सर्वमध्ये आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. कधी वास्तुशास्त्रातून मार्ग मिळतील तर कधी अंकशास्त्र मदत करेल. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, आयुष्य वेगळं आहे, राहणीमान वेगळं आहे आणि अपेक्षाही वेगळ्या आहेत. असं असताना सर्वांना एकच उपचार लागू होणार नाहीत. समस्या कुठे आहे आणि अपेक्षा काय आहेत त्याचा अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. अनेकांची आयुष्यं यामुळे बदलून गेली आहेत. त्याची वाच्यता कधी उघडपणे केली जाते तर कधी त्या गोष्टी फक्त परिणाम दाखवत असतात.
                   या शास्त्रांची मदत घेत असताना महत्वाचा आहे तो तज्ञांचा सल्ला. हे विषय वाचून समजतील आणि केवळ वाचलेलं, ऐकलेलं अवलंबून समस्या सुटतील हे गैरसमज आहेत. आमचे आत्तापर्यंतचे ब्लॉग असतील किंवा इतर माध्यमातून मिळणारी माहिती ही वस्तुस्थितीचं आकलन करून देणारी असते. या विषयाचे महत्व सांगणारी व जागरूकता निर्माण करणारी असते. त्यातून आपल्याला मार्ग दिसेल. पण अनुकरण करायचं असेल तर मात्र योग्य व्यक्तीची, तज्ञांची, विशारदाची आवश्यकता असते. कारण लहानसा खोकला असताना घरी केलेले उपचार गुण दाखवतीलही, पण रोगाची-आजाराची व्याप्ती जाणून घेऊन त्यावर नेमका उपचार करण्यासाठी जसा स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो तशातील हा प्रकार आहे. आपल्या वास्तूतील दोष, पत्रिके अनुसार मार्गदर्शन, स्वभावदोषांच्या अनुषंगाने राशीरत्न निवड असेल किंवा हस्तरेषा व अंकशास्त्रानुसार प्रश्नांची सोडवणूक असेल इत्यादी हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यासचं त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं आणि अज्ञानी माणसाचा सल्ला हा त्याहूनही अधोगतीकडे नेणारा असतो. त्यामुळे वेळीच विचार करून निर्णय घ्यावा आणि उत्कर्ष साधावा!!!



बुधवार, १८ मार्च, २०२०

वास्तुशास्त्र आणि ऑफिस



कुठलीही मानवनिर्मित जागा ही वास्तु असते. त्या वास्तूच्या रचनेनुसार एकतर ती वास्तु लाभते किंवा त्या वास्तूत दोष तरी असतो. आजपर्यंत आपण वास्तूमध्ये घर, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं कायम वास्तव्य असतं याबद्दल बोलत आलो आहोत. पण आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात काम करणार्‍या पुरुष अन स्त्रियांचा बराचसा वेळ कार्यालयात अर्थात ऑफिसच्या ठिकाणी जात असतो. नोकरी अथवा व्यवसाय करताना जी जागा आपण प्रत्यक्षात वापरतो त्याला आपण ऑफिस म्हणूयात! मग तुम्ही एखाद्या बँकेत नोकरी करत असाल, आयटी क्षेत्रात नोकरी करत असाल, स्वतःचं ऑफिस असेल किंवा दुकान असेल अशा प्रत्येक ठिकाणी वास्तु ही आपलं काम करतच असते. मग ते काम इष्ट फळ देण्याचं असो किंवा अनिष्ट!आणि त्यानुसारच तुमच्या पदरी यश-अपयश पडत असतं.
            ऑफिस हे आपल्या आर्थिक प्रगतिचे आणि आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारं स्थान आहे. तुम्ही जिथे काम करत असता त्या वास्तूत जर दोष असतील तर तुम्हाला आर्थिक प्रगती करताना अडथळे येऊ शकतात. कारण ज्या ठिकाणी आपल्या शारीरिक व बौद्धिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर होतो अशी ती जागा असते. त्यामुळे तेथे काम करत असताना जर सुयोग्य स्थिती नसेल तर त्यातून मिळणारे परिणामही फार सकारात्मक असणार नाहीत. वास्तुस्त्रातील अभ्यासानुसार,तुम्ही काम करताना कोणत्या दिशेकडे पाठ करून बसता, तुमचा टेबल ऑफिसच्या कोणत्या कोपर्‍यात आहे, तुमच्या आजूबाजूला खिडकी-दरवाजा आहे का अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबींवर तुमचं त्या क्षेत्रातील यश-अपयश अवलंबून असतं.
तुम्ही असे काही अनुभव नक्की बघितले असतील की जेथे एखादा व्यक्ति नव्यानेच व्यवसाय सुरू करतो, दुकान सुरू करतो आणि अगदी अल्पावधीतच त्याला यश मिळू लागतं. यामध्ये त्या व्यक्तीची मेहनत तर नक्कीच असते पण त्याला साथ लाभते ती त्याच्या व्यवसायाच्या वास्तुचं संपन्न असणं. कधी कधी वास्तूची रचना अनपेक्षितपणे इतकी उत्तम असते की त्यामूळे अविश्वासनियरित्या वृद्धी होऊ लागते. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करत असाल तर तुमच्या सोबतचा व्यक्ति पुढे निघून जातो, त्याचे प्रमोशन होतात, बॉससोबत त्याचे फार खटके उडत नाहीत पण तुम्ही मात्र आहे तिथेच अडकून राहता. तुम्हाला छोट्या-मोठ्या बाबतीत अडचणी येऊ लागतात. काम करूनही त्याचं श्रेय मिळत नाही आणि अवहेलना सुरू असते. याला काही अंशी स्वभाव तर जबाबदार तर असतोच पण मुख्य समस्या असते ती त्या वास्तूचा तुमच्यावर होणारा नकारात्मक परिणाम. कधी-कधी वास्तूची रचना अशी असते की त्यात विशिष्ट एका दिशेला बसणार्‍या, कोपर्‍यात बसणार्‍या वगैरे व्यक्तींना नकारात्मक फलप्राप्ती होत असते. म्हणजे दक्षिणेकडील दरवाजाकडे तुमचा टेबल असणे,पश्चिमेकडे खिडकी असणे, बसण्याच्या जागेच्या अगदी वर बीम असणे किंवा ईशान्य कोपर्‍यात केबिन असणे. असे अनेक निरीक्षणे वास्तुशास्त्रात नोंदवली आहेत ज्यावरून कामाच्या ठिकाणी वास्तूची रचना कशी असावी जेणेकरून सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. जर अशा काही समस्या असतील तर अगदी छोटे-छोटे बदल करून तुम्हाला परिस्थितीत सुधारणा घडवून आणता येते. साधं बांबूचं छोटसं रोप आपल्या टेबलवर ठेवणे किंवा बसायची खुर्ची योग्य दिशेला करून बसणे, लाकडी खुर्ची वापरणे असे उपाय केले तरी बराच फरक पडू शकतो.
ज्यावेळी भरपूर भांडवल लावून एखादा व्यवसाय सुरू केला जातो त्यावेळी वास्तुशास्त्राचा अभ्यास करून त्यानुसार ऑफिस अथवा फॅक्टरीची रचना करणे फायदेशीर ठरते. कारण ऑफिस एकदा स्थापित केलं की त्यात शक्यतो बदल करणे सोपं असत नाही. त्यामुळेच सुरूवातीलाच जर वास्तुशास्त्रत तज्ञ व्यक्तीचा सल्ला, मार्गदर्शन घेऊन ऑफिसची वास्तु उभारली तर त्याचा लाभ होऊ शकतो. बर्‍याचदा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाचा भरपूर व्याप असतो. त्यामुळे तेथे काम करणार्‍या व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतात. अशात कर वास्तुदोष असतील तर तेथे आणखीनच गंभीर समस्या उद्भवू शकतात. पण त्यात जर वेळीच योग्य बदल केले तर त्याचे सकारात्मक परिणाम खात्रीशीरपणे दिसून येतील.
वास्तुशास्त्रात सूर्यप्रकाश, स्वच्छ व खेळती हवा, गुरुत्वाकर्षण, विविध दिशांकडून येणार्‍या ऊर्जा यांचा अभ्यास असतो. आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिशेंचा एक विशिष्ट असा गुणधर्म आहे. ज्या प्रकारचं ऑफिस आहे, ज्या प्रकारचं तिथे काम होत असतं त्याप्रमाणे वास्तुची उभारणी केली किंवा त्यात बदल केले तर त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. म्हणजे जर समजा आर्थिक नियोजन किंवा अर्थकारणाशी निगडीत ऑफिस असेल तर त्या क्षेत्रात पश्चिम दिशा महत्वाची भूमिका बजावत असते. ऑफिसमध्ये Creativity संबंधित काम असतील तर त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना करता येते. वस्तूंची खरेदी-विक्री संबंधित व्यवहार त्या ऑफिसमधून होत असतील तर उत्तर व पूर्व दिशा महत्वाची ठरते. अशा अनेक बाबींचा विचार करून ती वास्तु परिपूर्ण असेल तर त्याचा निश्चितच मोठा फायदा होत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्राचा योग्य वापर केला तर आर्थिक प्रगती व सामाजिक प्रतिष्ठा यात यश मिळवणे शक्य आहे.

सोमवार, ९ मार्च, २०२०

वास्तु आणि विवाहयोग


प्रत्येक कुटुंबात सर्वाधिक आनंदाचा क्षण म्हणजे विवाह! विवाह हा कुटुंबातील आणि वास्तूमधील सर्वाधिक मंगल क्षण मानला जातो. आपल्याकडे लग्न हे केवळ दोन जीवांचं एकत्र येणं नसून दोन कूटुंब त्यामुळे एकत्र येत असतात. लग्नकार्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जात असतं. शिवाय,लग्न म्हणजे आपल्या घराण्याच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा योग असतो. पण आजच्या काळात “विवाह” ही एक मोठी समस्या बनला आहे. विवाह न जमणे आणि विवाहातून सुखप्राप्ती न होणे यामुळे लग्नसंस्थेवर विश्वास नसणार्‍यांची संख्या वाढत आहे. पण हे असं का घडत आहे याकडे कोणीही अभ्यासपूर्वक बघत नाही.
विवाहयोग नसणे ही आजच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. अनेक चांगल्या, संपन्न असलेल्या कुटुंबातील गुणी मुला-मुलींची लग्न लवकर जुळत नाहीत. सर्वकाही असून अपेक्षेसारखा जोडीदार न मिळणे यामुळे केवळ विवाहइच्छुक तरुण-तरुणीचं नाही तर त्यांचे कुटुंबियही काळजीत असतात. संपत्ती, रूप, चांगलं कूटुंब अशा सर्व जमेच्या बाजू असताना विवाह जुळत नाहीत याला वास्तूतील दोष कारणीभूत असतो. आपल्या घराची बांधणी आणि विवाहइच्छुक मुला-मुलींची राहणी या विवाह न जुळणे या अडचणीतले महत्वाचे मुद्दे आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिशेला एक तत्व आहे. जसं आग्नेय दिशेला अग्नि हे तत्व आहे. जर यातील काही तत्व असंतुलित झाले असतील तर त्या घरातील तरुण-तरुणींचे विवाह जुळणे कठीण होऊन बसते.
विवाहइच्छुक तरुण-तरुणी जर कोणत्या रंगाचे कपडे वापरतात,ते कोणत्या दिशेला झोपतात, त्यांची रूम कोणत्या दिशेला आहे, रूममध्ये कोणता रंग आहे अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबींचा अभ्यास करून वास्तुशास्त्रात विवाह न जुळणे या समस्येवर उपाय सुचवले आहेत. विवाहइच्छुक जोडप्यांनी शक्यतो उत्तर किंवा वायव्य दिशेच्या रूमचा वापर केला पाहिजे आणि झोपत असताना पूर्वेकडे डोकं करून झोपले पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. शिवाय, खोलीत गुलाबी अथवा निळ्या रंगाचा वापर केला तर तेही सकारात्मक बदल घडवण्यात हातभार लावू शकतं. असं केल्याने अपेक्षित स्थळ लवकर येऊ लागतात. जर विवाहइच्छुक तरुण-तरुणी बीम असलेल्या खोलीत किंवा आग्नेय दिशेला असलेल्या खोलीत जास्तकाळ वास्तव्य करत असतील तर ते टाळले पाहिजे.
प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि विवाह करताना प्रत्येकाच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. रंग-रूप-धन असा सर्व अभाव असणार्‍यांचीही लग्नं चटकन जुळतात आणि त्यांचा सुखाने संसार होऊ लागतो. पण कधी-कधी सर्वकाही असून स्वभावामुळेही लग्न जुळण्यास मोठा विलंब होताना दिसून येतो. त्यामुळे त्या तरुण-तरुणीच्या राहणीचा अभ्यास करून वास्तूत काही बदल केले तर त्याचा खूप मोठा फरक पडतो आणि लग्न जुळण्याची शक्यता वाढते. पण त्यापूर्वी संपूर्ण वास्तुचे परीक्षण करून त्यातील दोष जाणून घेणे हे आवश्यकच ठरते.
          विवाह जुळणे हा एक भाग आहे आणि त्यापुढचा भाग आहे विवाह टिकणे. विवाह न टिकणे हा आजच्या काळातील जटिल प्रश्न बनला आहे. नवरा=बायकोमध्ये न पटणे किंवा कुटुंबियांमध्ये सतत वाद होऊन लग्न मोडणे ही जणू आजच्या काळातील फॅशन झाली आहे. आणि हे प्रमाण सुशिक्षित कुटुंबात वाढल्याने परिस्थिती जास्त गंभीर झाली आहे. केवळ आणि केवळ वास्तुदोषामुळे असे प्रकार घडत असतात हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. लग्नापूर्वी एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं अचानक एकमेकांना का नकोसं होतं याचा विचार झालाच पाहिजे. नवरा बायकोची झोपण्याची खोली, घरातील स्वयंपाकघर, बैठक ते अगदी शौचालय जर चुकीच्या ठिकाणी बांधलं गेलं असेल तर असे प्रकार घडत असतात.
आपण ज्या वास्तूत राहत असतो ती प्रत्यक्षपणे आपल्यावर प्रभाव पाडत असते. विविध दिशांनी येणार्‍या ऊर्जा व त्यातून निर्माण होणारी कंपने त्या वास्तूत राहणार्‍या माणसाच्या आरोग्य व मनावर परिणाम करत असतातच. त्यानुसारच माणूस प्रतिक्रिया देत असतो आणि वागत असतो ज्यातून स्वभावगुण ठरतो. हा स्वभावगुण किंवा त्यात असणारे दोष हेच तर नातेसंबंध निर्माण करतात आणि संपुष्टातही आणतात. त्या ववास्तूत सकारात्मक बदल करून दोष कमी होतील आणि गुणांची तीव्रता कशी वाढवता याबद्दल वास्तुशास्त्र तज्ञ मदत करू शकतात.
शेवटी विवाहयोग म्हणजे तरी काय असतो! तर आपल्याला सुख मिळवून देणारा साथीदार लाभणे. तो शोधता आला पाहिजे आणि त्याच्यासोबतचं नातं टिकवता आलं पाहिजे. वास्तुशास्त्र यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतं हे लक्षात ठेवले पाहिजे.

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

ज्योतिष आणि कर्मफळ

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

अर्थ: तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको.
भगवतगीतेच्या दुसर्‍या अध्यायातील हा श्लोक आहे. भगवंतानेही स्पष्टपणे कर्म करण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत आपण कर्म करणार नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही.
                   ज्योतिषशास्त्र हे आपल्याला योग्य कर्म करण्याची दिशा दाखवणारं शास्त्र आहे. सामान्य माणसाला वाटतं की आकाशातील ग्रह-तारे आपलं भविष्य कसं ठरवू शकतात? पण आकाशातील ग्रह-तारे हे आपल्याला वर्तमानात कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यासाठीचा प्रकाशमार्ग दाखवत असतात. ज्या काळात आजच्या भौतिकशास्त्राचा किंबहुना दुर्भिणीचाही शोध लागला नव्हता त्याकाळात आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र विकसित केलं आहे. त्याअनुसार भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेता येतो आणि वर्तमानात काय निर्णय घ्यावेत हे समजून येतं. ज्याप्रमाणे हवामान विभाग सांगतो की मोठा पाऊस अथवा वादळ येणार आहे आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात कुंडलीचा (पत्रिका) अभ्यास करून त्या व्यक्तीसाठी अनुकूल-प्रतिकूल काळ, स्थळ, क्षेत्र इत्यादीचा अंदाज वर्तवत असतं. जर एखाद्याच्या कुंडलीचा अभ्यास करत असताना असं दिसून आलं की त्या मुलाला/मुलीला शिक्षणात फार गती नाही पण व्यवसाय करण्यास उपयोगी पडणारे सर्व गुण आहेत तर त्या व्यक्तिला प्रथमपासून व्यवसाय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता तयार करता येते. याचा अर्थ इतकाच की त्या मुलाला/मुलीला कर्म करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी योग्य दिशा समजून आली.
ज्योतिष जाणून घेणं अशासाठी महत्वाचं आहे की, आपण आपलं काम करत असताना, जीवतोड मेहनत करत असताना त्यातून अपेक्षित यश मिळत नसेल तर आपली सगळी मेहनत चुकीच्या दिशेने होत आहे हे समजून येईल. वार्‍याच्या विरुद्ध दिशेने नाव चालवणे जितके कठीण तितकंच कठीण असतं चुकीच्या दिशेने केलेली मेहनत. आजचा काळ हा Smart Work चा आहे. त्यामुळे कमीत कमी कष्ट घेऊन अपेक्षित साध्य साधता येणे शक्य असेल तर तो मार्ग अवलंबला पाहिजे. ज्योतिषशास्त्र त्यात मदत करेल. आपण कोणतं शिक्षण घ्यावं, कोणता व्यवसाय करावा, कोणत्या क्षेत्रात नोकरी करावी, विवाहयोग कधीजुळून येईल ते आरोग्यविषयक काय काळजी घ्यावी या सर्वामध्ये जर ज्योतिषशास्त्राची मदत घेतली तर आयुष्यात अभूतपूर्व बदल होताना दिसून आले आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण अनेक बाबींची स्पष्टता मिळवू शकतो. बर्‍याचदा आपण ऐकतो की एखाद्याच्या कुंडलीत राजयोग आहे, परदेशवारीचा योग आहे,धनलाभ संभव आहे,संततीसुख नाही, वाहनसुख नाही,विवाहयोग नाही वगैरे वगैरे. अशा प्रकारचं भविष्य आपण वृत्तपत्रातील राशिभविष्यात किंवा टीव्हीवरील कार्यक्रमात पाहतो. आपल्या राशीत चांगले योग असले तर आनंदाने हुरळून जातो आणि कठीण काळ वर्तविला असेल तर घाबरून जातो. पण एकच रास असणार्‍या दोन व्यक्तींचं आयुष्य काही सारखं असत नाही. कारण प्रत्येकाची कुंडली वेगळं सांगत असते आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं असतं. ज्योतिषशास्त्र हे इतकं उथळ नसून त्यात अतिशय लहानसहान बाबींचा अभ्यास केला आहे. जन्म आपल्या हातात नसतो त्यामुळे कुंडली आपण बदलू शकत नाही. पण कर्म आपल्या हातात असतं. अनुकूल-प्रतिकूल बाबींचा तक्ता मांडून आपण उचित निर्णय घेत गेलो तर कर्माच्या तराजूत आपलं पारडं जड असेल आणि त्याचं अपेक्षित फळही मिळेल.
ज्योतिष हे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा याचा भाग नसून पूर्णतः शास्त्र असल्याने त्यातून अपेक्षित परिणाम दिसून येणं ही सैद्धांतिक मांडणी आहे. त्याचा यथोचित व गुणात्मक वापर अनेकदा सिद्ध झाला आहे. त्यासाठी अतर्क्य गोष्टी करायची आवश्यकता नसते. योग्य तज्ञाचा सल्ला घेऊन ज्योतिषशास्त्राचा उपयोग आपल्याला आयुष्य सोपं, सुलभ व आनंदी करता येतं. नशिबाला दोषी ठरवण्यापेक्षा योग्य कर्मावर आपला विश्वास असायला हवा. 

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

वास्तु: भाड्याचे घर व गृहप्रवेश


एखाद्या वास्तुमध्ये दोष असतो म्हणजे काय? याबद्दल आपण आधीच्या ब्लॉगमधून काही अंशी जाणून घेतलं आहे. पण वास्तुदोषाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची तीव्रता आज आपण समजून घेणार आहोत.
वास्तुशास्त्राबद्दल बोलत असताना आपण दहा दिशा, गुरुत्वाकर्षण, वैश्विक ऊर्जा अशा अनेक घटकांचा विचार करत असतो. यातील प्रत्येक दिशेशी एक तत्व निगडीत आहे. प्रत्येक ऊर्जेचा मानवी शरीर व मनावर थेट परिणाम असतो. जर यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर त्याचे विपरीत परिणाम वास्तुमध्ये राहणार्‍या मानवांवर होत असतात.
कुटुंबाला सुख लाभतच नाही, कुठल्याच क्षेत्रात यश येत नाही,घरातील तरुण पिढी वाईट मार्गावर जात असणे,सतत आर्थिक नुकसान होत राहणे,हितशत्रूंपासूनत्रास होणे अशा समस्या ज्या सर्वसामान्य कुटुंबात सहजासहजी दिसून येत नाहीत त्या वास्तुदोष असलेल्या कुटुंबात दिसून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे,आग्नेय ही अग्नि तत्वाची दिशा आहे, ईशान्य जल तत्वाची आहे तसं सर्वच दिशेला पंचमहाभूतांतील एका तत्वाशी बांधलं गेलं आहे. त्या दिशेत जर गंभीर दोष असतील तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतात. खासकरून घरातील सदस्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य ढासाळू शकतं.
आपल्यातील अनेकांनी एक अनुभव नक्की घेतला असेल की, एखाद्या नवीन वास्तूत राहायला गेल्यावर सुरुवातीला थोडं अस्वस्थ वाटत असतं. ज्या लोकांचं स्वतःचं घर नाही व त्या कारणाने सतत नवीन घरात राहायला जावं लागतं अशांनी हा अनुभव नक्की घेतला असेल.नोकरी अथवा इतर निमित्ताने ज्यांना सतत घर बदलायची वेळ येते त्यांना असे अनुभव नवे नाहीत.ज्या वास्तूत आपण राहायला जातो त्या वास्तूचे आपल्यावर परिणाम होत असतात हेच यातून स्पष्ट होतं. कधी कधी एखाद्या घरात राहायला गेल्यावर भरभराट होऊ लागते तर कधी एखादं घर अधोगतीस कारणीभूत ठरतं. यापुढे जाऊन सांगायचं तर काही वास्तु या अशुभ अथवा अरिष्ट आहेत अशा चर्चा आपण ऐकत असतो. एखादा जुना वाडा असो किंवा भौतिकदृष्ट्या चांगलं घर असो, ते लाभत नाही असं म्हणतात. त्या वास्तूत राहणार्‍यांना चित्रविचित्र भास होत असतात, शांत झोप लागत नाही, वाईट स्वप्नं पडत असतात, सतत असुरक्षिततेची जाणीव होत असते वगैरे वगैरे. अशा घटना आपण ऐकतो, वाचतोपण त्याची कारणीमीमांसा करू शकत नाहीत. शिवाय, त्यात काही तथ्य आहे की नाही याबद्दल आपल्याला खात्री नसते. पण वास्तूच्या बांधणीमध्ये खूप मोठे दोष असतील तर ती वास्तु नकारात्मक उर्जेचं केंद्र बनून जाते. काही वास्तूच्या आसपास किंवा ज्या जागेवर वास्तु उभी आहे तेथे नकारात्मक शक्तींचा उगम असू शकतो. जसं मंदिरात प्रसन्नता लाभते तसं काही ठिकाणी अस्वस्थता जाणवू शकते. जर एखाद्या ठिकाणी वाईट उर्जांचा प्रवाह तीव्र असेल तर तेथे मानवी स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविकच आहे. वास्तुमधील दोषांमुळे इतके गंभीर प्रकार होऊ शकतात आणि महत्वाची बाब म्हणजे ते दोष निवारण करता येतात. जर नवीन जागेत राहायला जाणार असाल तर ती जोखून घ्यावी आणि वास्तूत राहायला जाण्यापूर्वी त्याचे गृहशांतही करून घ्यावी असे संकेत आहेत. वास्तूत राहायला जाण्यापूर्वी वास्तुशास्त्रतज्ञाचा सल्ला घ्यावा. यामागे हेतु एकच की ज्यावेळी एखादं कुटुंब त्या वास्तूत राहायला जातं तेंव्हा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ नयेत.
ज्यावेळी स्त्री लग्न करून गृहप्रवेश करते तो क्षण त्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचा व Turning Point असतो. कारण घरात नव्याने राहायला आलेली स्त्री त्या कुटुंबासाठी गृहलक्ष्मी चं रूप असते. जर वास्तूचा त्या स्त्रीवर सकारात्मक परिणाम होत असेल तर कुटुंबात आनंद व समाधान नांदू लागतं अन्यथा कुटुंबात विभक्तपणाही येऊ शकतो. त्या स्त्री चं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहणं महत्वाचं असतं. स्त्रियांचा स्वभाव लग्नानंतर बदलतो असं म्हणतात त्यामागेही कुठेतरी वास्तूतील झालेला बदल हे एक कारण असू शकतं. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर सत्यनारायन, वास्तुशांत, गृहशांती करण्याचे संकेत आहेत.
जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर वास्तु इतकी महत्वाची ठरणार असेल तर ती वास्तु निर्दोष असावी. शांत, सुखी आणि प्रगतिच्या वाटेवरील जीवनासाठी निर्दोष व संपन्न वास्तूची निवड करावी!

ज्योतिष आणि गैरसमज


आपण याआधीच्या ब्लॉगमधून ज्योतिष म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली होती. ज्योतिष या शब्दाची फोड ज्योत + भविष्य अशी करता येईल. याचा अर्थ या शास्त्रातून भविष्याचा वेध घेता येतो हे स्पष्ट आहे. पण चित्रपटात दाखवतात तसं ही काही Time Machine नाही की आपण आरपार पाहू शकतो. ज्योतिषशास्त्रात अनेक बाबींचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात तेसंकेत असतात, अंदाज असतात. आयुष्य खूप मोठं आहे. त्यात सर्वांनाच सुखाचा हव्यास आहे. मग या दीर्घ आयुष्यात सुखाकडे वाटचाल करायची असेल तर योग्य मार्गदर्शन असायलाच हवं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, कोणते धोके असू शकतात, काय संधी असू शकतात, कोणत्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे, कुठे ठेच लागू शकते आणि कुठे जरासा विसावा घेतला पाहिजे हे सर्व ज्योतिषशास्त्राच्या आधारे जाणून घेता येतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघू शकतो की येणार्‍या काळात ग्रहमान प्रतिकूल असून पोट, हृदय संबंधित विकार उद्भवू शकतात तर साहजिकच ती व्यक्ति काळजी घेऊन ते टाळू शकते. किंवा जर ग्रहमान अनुकूल असेल आणि पत्रिकेत धनलाभ योग दिसून येत असेल तर ती व्यक्ति व्यवसायात धाडस करू शकते किंवा शेअर मार्केट व इतर क्षेत्रात प्रयत्न करून आर्थिक लाभाच्या संधी हस्तगत करू शकते.
          ज्योतिषशास्त्र हे वैज्ञानिक कसोटीवरही खरं ठरत असताना आणि जगभरात त्याचा अभ्यास केला जात असताना त्याबद्दल अनेक गैरसमज सुद्धा रूढ होत गेले आहेत. लग्न पत्रिकेत मंगळ ग्रह असणे, शनीची साडेसाती,राहूचं भ्रमण अशा बाबतीत ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन वाट्टेल ते उपाय केले जातात. शिवाय, अचानक धनलाभ व्हावा म्हणून तर्‍हेतर्‍हेचे प्रताप केले जातात. आजकालच्या तरुणांमध्ये हव्या त्या व्यक्तिचं प्रेम मिळविण्यासाठीही ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन चित्रविचित्र उद्योग केले जातात. समाजातील अडचणींने ग्रासलेल्या सामान्य मानवांचा गैरफायदा घेणारे लोकही आहेतच. केवळ अशा काही प्रकारांमुळे ज्योतिषशास्त्र, कुंडली याबद्दल समाजात गैरसमज पसरताना दिसून येतात. शेवटी कर्म केल्याशिवाय फलप्राप्तीची अपेक्षा करणे चुकच आहे. ग्रहमान अनुकूल असूनही जर एखादा व्यक्ति प्रयत्न करत नसेल तर त्यातून फळाची अपेक्षा करणे गैरच आहे. आपल्याकडे प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते योग्यच आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे, ज्योतिषचा अर्थ ज्योति+भविष्य असा आहे म्हणजे जिथे ज्योति आहे तिथे प्रकाश आहे; हे प्रकाशमय भविष्याकडे घेऊन जाणारं शास्त्र आहे. तेथे अंधाराकडे घेऊन जाणार्‍या अंधश्रद्धेला थारा नाही. त्यामुळे सर्वांनी सजग राहून योग्य तो पर्याय निवडणे आवश्यक आहे.
ज्योतिषशास्त्राचा अवलंब करून आयुष्यातील अनेक जटिल समस्यांवर मात करता येते. अशक्यही शक्य करता येतं, पण त्यासाठी कृतीशील असणं आवश्यक आहे. आपल्यातील अवगुणांचं ओझं सोडून नवीन दृष्टीकोणातून प्रारंभ करावा लागतो. विधिलिखित बदलता येत नसलं तरी सावध राहून त्यातून मार्ग शोधता येतात. जसं वैद्यकशास्त्र,संगणकशास्त्र हे मानवी हिताचे आहेत तसंच ज्योतिषशास्त्रही.
ज्योतिषशास्त्र शिक्षण, आरोग्य,करियर,धनलाभ,वास्तुसुख, संततीसुख,कौटुंबिक सुख,परदेशवारी, प्रसिद्धी अशा मानवी आयुष्यातील प्रत्येक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण परीक्षण करून योग्य मार्गदर्शन करू शकते. त्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रातील तज्ञ व्यक्तीकडे जाऊन कसलाही संकोच न करता त्यांना सर्व माहिती दिली पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यात अपेक्षित सुख साधता येईल.


रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य : भाग २

आर्थिक सुख मिळाल्यानंतर आरोग्यचं सुखही अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे पैसा कितीही असूद्या पण
जर त्याचा उपभोग घेण्यासाठी उत्तम आरोग्य नसेल तर सर्वकाही निष्फळ आहे. जीवन हसत हसत जगून समाधानाने
मृत्यू येणे हीच सुखी आयुष्याची व्याख्या आहे. यामध्ये संपन्न व दोषमुक्त वास्तु सर्वात महत्वाची भूमिका निभावते
असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. वास्तूचा सर्वाधिक परिणाम होत असेल तर तो म्हणजे त्या वास्तूत सतत निवास
करणार्‍या मानवी शरीर व मनावर. विविध दिशेने येणार्‍या सकारात्मक-नकारात्मक वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण
हे वास्तूत राहणार्‍या शरीर-मनावर परिणाम करतात आणि त्यातूनच शारीरिक व मानसिक आरोग्याची
जडणघडण होत असते. 
काही घरांमध्ये सतत आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात. एक झालं की दुसरं दुखणं सुरूच असतं. दुर्दैवाने
अकाली मृत्यूही होतात. घरात सतत वाद-विवाद होत असतात. मानसिक अस्वास्थ्य जाणवत असतं. असं
होऊनही माणसं वर्षानुवर्षे ते निमूटपणे सहन करतात. पण त्यावर सोपे उपाय अवलंबून आहेत. त्यात खूप खर्च
करणे अथवा जागेची तोडफोड करणे अशी आवश्यकता नाही. आपल्या वास्तूत छोटे-मोठे बदल करून आणि
काही सुचनांचं अवलंबण केलं तर या सर्व जाचातून सुटका मिळू शकते.  
आपण आरोग्य आणि वास्तूच्या बांधणीत काय संबंध असू शकतो याची उदाहरणे पाहुयात. जसं घराच्या ईशान्य
कोपर्‍यात बेडरूम असेल तर ती विविध रोगांना आमंत्रण देणारी ठरते. खासकरून घरातील कर्ता पुरुष जर
त्या खोलीत झोपत असेल तर केवळ आरोग्यच नाही तर त्याच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतात.
नैऋत्य दिशेला जर काही अडगळ ठेवली तर पृथ्वी तत्व स्थिर राहतं, आग्नेय कोपर्‍यात स्वयंपाकघर असेल तर
त्यात अग्नि तत्व स्थिर राहतं. अशी प्रत्येक दिशेची तत्व आहेत ज्यानुसार घराची रचना केली तर निर्दोष वास्तु
आपल्याला सुख-समाधान देण्यात सफल होत असते. पण केवळ असे वरवर उपाय केले म्हणजे आपल्या
समस्या सुटून लागलीच त्यातून फलप्राप्ती होईलच असं नाही. आपल्या घराची एकंदरीत बांधणी, आजूबाजूला
असलेला परिसर, खिडक्या-दरवाजे कोणत्या दिशेला आहेत हे सर्व तपासून पाहावं लागतं. नेमका दोष कोठे
आहे आणि त्याचा घरातील कुटुंबावर काय परिणाम होत आहे हेसुद्धा तपासावे लागते. घरात एखाद्या सदस्याला
सतत वात, पित्त, डोकेदुखी असे काहीना काही त्रास होत असतील तर पूर्वकडील आणि दक्षिणेकडील
रूममध्ये दोष असू शकतो. दक्षिण दिशेला टीव्ही असेल तर टीव्ही बघत जेवण करण्याची सवय असणार्‍यांना
त्रास उद्भवू शकतात. घरात काही आनुवंशिक आजार असतील तर संतुलित वास्तूच्या सहाय्याने त्यांचीही तीव्रता
कमी करता येते. आरोग्यासंबंधित असे अनेक संकेत, सूचना वास्तुशास्त्रात केले आहेत. आरोग्य आणि वास्तु
यांचा थेट संबध आहे असं वास्तुशास्त्र सांगतं. आपली वास्तु शक्य तेवढी दोषमुक्त असावी जेणेकरून निरोगी
आयुष्याचा उपभोग घेता येईल!
आरोग्य व आर्थिक सक्षमतेसाठी काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात अशा असतात. उदाहरणार्थ, घरात तुटके-फुटके आरसे असू नयेत, कोपर्‍यात भंगारवस्तु जमा केलेल्या असू नयेत, वास्तूशांतीचे नारळ, निर्माल्य हे जमा करून ठेवलेले असू नये, घरच्या मुख्य दरवाजाला उंबरा असणं आणि वेळोवेळी तो साफ करणं आवश्यक आहे. काय करू नये हे जसं महत्वाचं आहे तसं काय करावे जेणेकरून वास्तु संतुलित व लाभदायी राहील हेही महत्वाचं आहे. त्यामध्ये टिप्स बर्‍याच देता येतील. उदाहरणार्थ, घरात लक्ष्मीयंत्र असणे, कुबेरमंत्र उच्चारणे, घरात बांबू ट्री ठेवणे, उत्तर दिशेला असलेली खिडकी उघडी ठेवणे, आग्नेय कोपर्‍यात वास्तुपुरुषाची स्थापना अशा अनेक बाबी आहेत ज्यांचा अवलंब आपल्याला आर्थिक संपन्नता व आरोग्यदायी जीवन देऊ शकतं. पण या बाबी मनाने करण्यापेक्षा तुम्ही सुविद्य वास्तुशास्त्रतज्ञकडून जाणून घ्याव्यात आणि त्याची अमलबजावणी करावी. शेवटी आपल्या वास्तूत नेमका दोष कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी वास्तुचं परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच समस्येचं मूळ स्पष्टपणे समजू शकतं. दोषमुक्त वास्तु हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणता येईल.

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १


वास्तुशास्त्र म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच्या ब्लॉगमधून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सामान्य माणूस संपन्न वास्तूचा अट्टहास धरत असतो. ज्यावेळी त्याला अडचणी येतात किंवा सर्व सुरळीत सुरू असताना काही अशुभ होऊ नये या चिंतेने तो वास्तुशास्त्र या विषयाकडे वळतो. आरोग्य,धन, शिक्षण,प्रतिष्ठा,करियर, विवाह असे अनेक विषय आपण वास्तुच्या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. जर त्यासंबंधी काही समस्या असतील तर त्यावर उपायही करू शकतो.

आपली वास्तु सुख देणारी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि सुखाची व्याख्या ही आर्थिक व आरोग्याच्या सुखाच्या जवळ येऊन थांबते. आपल्याकडे धनसंपत्ती असावी आणि उत्तम आरोग्य असावं जेणेकरून आपण सुखी होऊ शकतो असं सर्वांनाच वाटत असतं. त्यामुळे आपण धन आणि आरोग्य यांचा वास्तूशी संबंध काय असतो, शिवाय धन व आरोग्य प्राप्तीसाठी वास्तु कशी असावी, त्यात छोटे-मोठे काय बदल करावेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आधी आपण धन या विषयावर जाणून घेऊ!
आर्थिक सुबत्ता ही आजच्या काळातील गरज आहे. वाढणारी महागाई, शहरी जीवनशैली, समाजातील असुरक्षितता अशा अनेक गोष्टी आहेत जेणेकरून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. शिवाय, आजच्या युगात आपल्या आर्थिक संपन्नतेवर समाजात प्रतिष्ठा लाभत असल्याने प्रत्येकजण पैसे कमविण्यासाठी धडपडत असतो. पैसे येण्याचा एकच स्रोत असू नये, विविध बाजूंनी पैसा यावा यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. हे काळाशी सुसंगत आहे. या बहुतांश लोकांची दुसरी अडचण अशी असते की पैसा येतो मात्र तो टिकत नाही. घरात पैसा न टिकणे हे फार अशुभ वं धोकादायक आहे. कारण याचा अर्थ असा की लक्ष्मीमाता आपल्याकडे राहू इच्छित नाही. ती आपल्याकडे येत आहे पण आपल्या चुकीच्या व्यवहारामुळे आपल्यावर नाखुश होऊन ती आपल्याजवळ रहात नाही. या विषयावर वास्तुशास्त्रात सखोल अभ्यास केला आहे. नोकरीतून येणारा पैसा हा स्थिर असतो. म्हणजे महिन्याला अमुक-अमुक रक्कम तुमच्याकडे येत असते. येथे विषय असतो तो ती रक्कम टिकवणे आणि त्याची वृद्धी होणे. जर नोकरी बदलून चांगल्या पगाराची नोकरी मिळणे अपेक्षित असेल तर तो विषय फक्त पैशांचा नसतो तर तुमच्या बुद्धीचा, आवडीचा असतो. व्यापरातून येणारा पैसा हा स्थिर नसतो. तो कधी कमी तर कधी जास्त होत असतो. येथे पैसा येणे निश्चित नसल्याने लक्ष्मी मातेला प्रसन्न करणे आवश्यक आहे. आपण अनेकदा बघतो की एखादा व्यापारी त्याच्या धंद्यात अचानक पैसे कमवू लागतो आणि बघता बघता करोडपती होतो. ही किमया असते.
वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घराचा मुख्य दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा असे संकेत आहेत. सूर्याच्या उगवण्याची दिशा पूर्व असल्याने सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरात येते असं त्यामागील कारण आहे. पण जर समजा आपलं घर त्यापद्धतीने बांधलेलं नसेल तर लागलीच त्यात तोडफोड करण्याची गरज नाही. वास्तुशास्त्रतज्ञाची मदत घेऊन विनातोडफोडही यावर उपाय करता येतो. त्यासाठी आपल्या घराचं परीक्षण करणे आवश्यक आहे. यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पितळ धातुपासून बनवलेलं “ओम” चिन्हं लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.आग्नेय दिशा ही धनप्राप्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आग्नेय म्हणजे अग्निची दिशा! आणि अग्नि म्हणजे ऊर्जा. त्यामुळे त्या दिशेचा कार्य आणि त्यातून येणारं धन याच्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे आग्नेय दिशेला काही दोष असतील तर घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. घरात पैसा न येणे हा त्यामध्ये महत्वाचा दोष मानला जातो. आग्नेय दिशेसोबतच उत्तर ही पैशांची दिशा मानली जाते. त्या दिशेला जर काही जड वस्तु असतील तर त्या वास्तुतही दोष आहे असं म्हणता येतील. त्यामुळेच या सर्वांचं योग्य परीक्षण करून वास्तूतील दोष कमी करणे आवश्यक ठरते.घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली आहे, देवघर कोणत्या दिशेला आहे अशा बाबींचा अभ्यासही करावा लागतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घरातील व्यक्तींच्या कार्यक्षमतेवरच घरातील लक्ष्मीचं येणं अवलंबून असल्याने या सर्व बाबींचा अभ्यास महत्वाचा ठरतो. शेवटी, आर्थिक सुबत्ता हा प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. कधी कधी कष्ट करूनही पैसा मिळत नाही आणि त्यातून मग नैराश्य येतं आणि नशिबाला दोष दिला जातो. या सगळ्यातून बाहेर पडणे सहज शक्य आहे. आपल्याला फक्त आपल्या वास्तूतील दोष कमी करावे लागतील आणि स्वतःचे गुण जाणून घ्यावे लागतील.

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र


प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा शोध सुरूच असतो. पण आयुष्यात एकाच वेळेस सर्व सुख मिळत नसल्याने माणूस समाधानाने जगू शकत नाही. आरोग्य, धन-संपत्ती,नातेसंबंध,शिक्षण या सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळत नाहीत. एक आहे तर दुसरं नाही अशी अवस्था असते. त्यामुळे समाधानाने जगता येत नाही. पण समाजात असे काही व्यक्ति असतात, अशी काही कुटुंबं असतात ज्यांना समाधान लाभतं! त्यांच्या अशा निस्सीम जगण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. पण जर याचा सखोल विचार केला तर त्यामागे एक परिपूर्ण वास्तु असल्याचं आढळून येईल. समाधानी आयुष्यासाठी निरोगी शरीर, निरोगी मन आणि पूर्ण कार्यशीलतेने काम करणे महत्वाचं आहे. जर आपली वास्तु दोषमुक्त असेल तर आपण सुखी जीवनाच्या मार्गावर असतो असं खात्रीने म्हणता येईल. ज्या ठिकाणी आपण बहुतांश वेळ राहतो, जेवतो, झोपतो, अभ्यास करतो, महत्वाचे निर्णय घेतो ती वास्तु जर आपल्यावर प्रभाव टाकणारी असेल तर ती निर्दोष व परिपूर्ण असलीच पाहिजे.
आपण आधीच्या ब्लॉगमध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं. माणसाने स्वतःच्या निवार्‍यासाठी एखादी झोपडी जरी बनवली असेल तरी ती वास्तुच असते. कुठल्याहीवास्तूमध्ये वास्तुशस्त्राप्रमाणे बदल करून ती वास्तु दोषमुक्त केली तर आयुष्यातील अनेक समस्यांमधून सुटका मिळू शकते.आपल्या जीवनात आरोग्य, धनसंपत्ती,नातेसंबंध, शिक्षण, करियर हे सुखाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रत्येक मुद्द्यांचावास्तुशास्त्रात विचार केला गेला आहे. अपयश येणे यामागे अनेक कारणे असू शकतात. पण त्यासाठी स्वतःत बदल करणे हाच उपाय आहे. जर स्वतःमध्ये ते बदल घडवायचे असतील आपल्यावर प्रभाव टाकणार्‍या वास्तूतही ते बदल करणे आवश्यक आहे. आपण पूर्ण क्षमतेने काम करावे,आपल्यातील दोष कमी होऊन क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा असं वाटत असेल तर आपली वास्तु त्यासाठी अनुकूल असावी लागते हेही तितकेच महत्वाचे आहे.
आपण लहानपणापासून घरातील जेष्ठांकडून ऐकत आलो आहोत की दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, उंबर्‍यावर शिंकू नये, घराचा दरवाजा योग्य योग्य दिशेत योग्य पदात असावा वगैरे. या काही कपोलकलिप्त गोष्टी किंवा अंधश्रद्धा नसून त्यामागे शास्त्रीय कारण आहे. यामागे काहीतरी तर्क आहे. वास्तुशास्त्र अशाच तर्कांच्या आधारे वास्तूची रचना कशी असावी याबद्दल सूचना करत असतं. काही घरांमध्ये सतत कोणीतरी आजारी असतं. एक झालं की दुसरं दुखणं सुरू असतं. अशाने मग त्या कुटुंबाची मनोवस्था आणि आर्थिक स्थितिही बिघडत जाते. काही कुटुंबात सतत कलह होत असतात. अगदी छोट्या-छोट्या प्रसंगावरून भांडणं होतात. काही कुटुंबात पैसे येतात पण ते टिकत नाहीत. कुठल्यातरी निमित्ताने पैशांचा क्षय होत असतो. या अशा घटना अनेक कुटुंबात घडत असतात पण त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कोण करत नाही. वास्तुशास्त्रात याचा अभ्यास केला आहे आणि त्यानुसार उपायही निश्चित केले आहेत. अशा घरात वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार कोणते बदल करावेत जेणेकरून सर्व तक्रारींपासून सुटका करून घेता येईल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळू शकतं. अगदी साधं सांगायचं झालं तर घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर मोठं झाड असू नये जेणेकरून स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा येण्यापासून त्याला अवरोध व्हावा. पूर्व ही सूर्याची उगवण्याची दिशा आहे. जर सूर्याची प्रकाशमान किरणे घरात येत असतील तर ती घरातील सदस्यांच्या आरोग्याला उपयुक्तच ठरणारी असतात. असे सामान्य व सहज अवलंबता यावेत असे संकेत पाळले तर मोठी हानी होण्यापासून जपून राहता येतं. घरात नेमकी कोणती समस्या आहे त्याचा अभ्यास करून वास्तूमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. वास्तुतज्ञच यामध्ये योग्य मदत करू शकतात.
                   माणसाचं भवितव्य हे त्याच्या भूतकाळावर नाही तर त्याचं वर्तमान कसं आहे यावर अवलंबून असतं. अशिक्षित पालकांची मुलं आयएएस, आयपीएस होतात. आरोग्याच्या सर्वच तक्रारी काही आनुवांशिक असत नाहीत. तुमची राहणी, तुमच्यावरील संस्कार, संगत आणि तुमची स्वतःची विचारशैली हे तुमचं भवितव्य ठरवत असते. मानसाच्या जडणघडणीत वास्तूचा मोठा सहभाग असतो.
घर बांधत असताना ते ते वास्तुशास्त्राच्या संकेतनुसार बांधलं तर उचित राहील. पण जर घर बांधून झालं आहे आणि आता जर तुम्हाला वास्तुशास्त्राच्या संकेतांचं अनुकरण करायचं असेल तर राहत्या घरात मोठी तोडफोड करायची गरज नाही. जर आहे त्या घरामध्ये काही बदल केले तरी अपेक्षित फळ मिळू शकतं.देवघराची जागा बदलणे,बैठकीच्या खोलीत थोडेसे बदल करणे,पैसे ठेवायच्या जागेत बदल,अडगळीची खोली बदलणे, घड्याळ-कॅलेंडर योग्य ठिकाणी लावणे असे छोटे-मोठे बदल त्याअंतर्गत येतात. अशा पद्धतीचे अनेक छोटे-मोठे बदल करून परिपूर्ण आणि दोषमुक्त वास्तु आपल्याला चिंतामुक्त करेल.
वास्तुशास्त्र हे आजच्या काळात अतिशय उपयुक्त ठरू शकतं. कारण आपल्याकडे फ्लॅट संस्कृती रुजू लागली आहे. एकाच इमारतीत अनेक फ्लॅट असतात. ते आपल्या मनाजोगे असत नाहीत. तयार असतात त्या स्थितीत आपल्याला घ्यावे लागतात. बिल्डर काही वास्तुविशारद नसतो किंवा त्यांचा दृष्टीकोण व्यावसायिक असल्याने त्यांनी वास्तुशास्त्राच्या संकेतानुसार बांधकाम केलेलं नसतं. मग अशा परिस्थितीत जो फ्लॅट आपण घेतलेला असतो त्यात काही बदल करून ती वास्तु परिपूर्ण बनवणे शक्य आहे. एवढी मोठी वास्तु घेत असताना ती परिपूर्ण असावी असा अट्टहास असणे गैर नाही. ती आपल्याला हवी तशी मिळेल याची शाश्वती नसेल पण ती आपल्यावर हवा तसा प्रभाव टाकू शकते याची काळजी मात्र आपण वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने घेऊ शकतो.