शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग २


नमस्कार मित्रांनो!!!
आयुष्यचं GPS ज्योतिषशास्त्रच्या भाग १ मध्ये आपण बघितले की कशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्याला मार्ग दाखवून आपलं आयुष्य सोयिस्कर करू शकते. आता आपण ज्योतिषशास्त्राचे अजून काही फायदे बघूयात!
आरोग्याच्या तक्रारी या आयुष्यभर सुरू असतात. तारुण्याच्या धुंदीत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोही, पण शरीराला कधीतरी त्याचा सोस जाणवतोच. मग असलेला पैसा, ज्ञान या सर्व गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. आरोग्य हीच एकमेव संपत्ती असल्याची जाणीव होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण जर आपल्याला आधीच अंदाज असेल की आपल्याला आरोग्याच्या बाबतीत कोणत्या समस्या उद्भवू शकतात तर? ही आयुष्यात किती मोठं वरदान ठरेल! ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तिला शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित त्रास होऊ शकतो याबाबत माहिती मिळवू शकतो. म्हणजे, कोणत्या व्यक्तिला किडनी संबंधित विकार होऊ शकतात, हृदय, पोट असे विकार होऊ शकतात असे संकेत मिळवू शकतो. तसं जर असेल तर ती व्यक्ति त्याबाबतीत आधीच जागरूकता ठेऊन तो आजार होण्यापासून स्वतःला वाचवू शकते.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कुटुंबियांची आणि मित्रपरिवारची साथ आवश्यक असते. कधी संकटसमयी आधार म्हणून तर सुखाच्या क्षणात सोबती म्हणून आपल्याला माणसे हवी असतात. आपल्या माणसांशी जोडून राहणं, नातेसंबध टिकवणे हे फार महत्वाचं असतं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण याकडे नकळतपणे दुर्लक्ष करत असतो. कधी-कधी विनाकारण गैरसमज करून घेऊन किंवा रागाच्या भरात दुखावली जातात. हे टाळणे आवश्यक असते. पत्रिकेत अशी काही ग्रहस्थिती निर्माण होते जेणेकरून असे प्रसंग उद्भवतात. आपल्याला जर आधीच अशा अपघाताच्या वेळेची माहिती असेल तर सय्यमाने वागू शकतो. खासकरून लग्न हा प्रसंग आहे ज्यावेळी दोन कुटुंब एकमेकांशी जोडले जात असतात. अशा वेळेस ज्योतिषशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकतं. लग्नंनातरही बर्‍याचदा पती-पत्नी संबंधात दुरावा निर्माण होतो. त्याचा परिणाम हा पूर्ण कुटुंबावर होत असतो. चूक कोणाचीही नसते पण केवळ परिस्थितिची देण म्हणून कुटुंब विभक्त होतात. जर यावर वेळीच उपाय केले आणि मनातील जळमटं साफ झाली तर कुटुंबातील वाद थांबवता येतात. या बाबतीत ज्योतिषशास्त्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतं.
        आपण आयुष्याच्या या सर्व बाबींमध्ये ज्योतिषशास्त्र एखाद्या GPS प्रमाणे मार्गदर्शक म्हणून काम करू शकतं हे पाहिलं. पण हे साध्य कसं करता येतं याबाबत अनेकांना अनेक प्रश्न असतात. कदाचित काही अतिरेकी कथा ऐकल्याने यावरचा अतिविश्वास किंवा अविश्वास त्यांना वेगळ्या निष्कर्षापर्यन्त पोचवू शकतो. पण ज्योतिषशास्त्रात पत्रिकेचा आणि त्यातील ग्रहस्थितीचा अभ्यास केलेला असतो. प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक स्वभावधर्म आहे. तो पत्रिकेतील कोणत्या स्थानी असतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. कधी शुक्र तुमच्या करियरबद्दल सांगतो तर कधी गुरु ग्रह तुमच्या यशाचा कारक बनतो. कधी शनि महाराज तुम्हाला अडथळा बनत असतात तर कधी राहू-केतू तुमच्या वाईट स्थितीला जबाबदार असतात. या सर्व बाबतीत अनेक वर्षांचा अभ्यास बोलत असतो. जसं अवकाशात असलेला सॅटेलाइट पृथ्वीवर असलेल्या एका माणसाला योग्य रस्ता दाखवू शकतो तसाच एक ग्रह माणसाला चांगलं-वाईट फळ देऊ शकतो. येथे निरीक्षण आणि निष्कर्ष महत्वाचा ठरतो. आयुष्याचा दीर्घ प्रवास करत असताना आपल्याला जे शोधायचं आहे तेथे ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी किंवा कधी हरवलेपणाची स्थिती निर्माण झाली तर तेथेही ज्योतिषशास्त्र तुमची निश्चित मदत करू शकतं.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग १


आजचा युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. मानवाने जशी जशी प्रगती केली त्यामध्ये तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाने सामान्य माणसाचं आयुष्यही बदलून गेलं. ज्यावेळी विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाचं आयुष्य सोपं करण्यात होऊ लागतो तेंव्हा समाज व्यापक दृष्टीने परिपूर्ण होत जातो. मानवाच्या अशाच एका शोधापैकी एक आहे GPS! म्हणजे Global Positioning System! एक अशी यंत्रणा जी माणसाला दिशादर्शक ठरते. याचा वापर आपण अनेकदा केला आहे. गावाला जाताना रस्ता शोधण्यासाठी असेल किंवा गावातच एखादा पत्ता शोधत असताना आपण अगदी सहजरीत्या मोबाइल काढतो आणि त्यात मार्ग शोधतो. त्यात आपल्या आजूबाजूचा परिसर दिसतो, आपण सध्या कुठे आहोत याचं अवलोकन होतं आणि आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी सहज सोपा मार्ग कोणता हेही दिसतं. एकंदरीत, आपल्या लक्षापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळतं. या घटनेत आपण त्या यंत्राचे, त्या संशोधनाचे केवळ एकतर्फी उपभोगते असतो. आपण ना त्याचा निर्माण केला आहे किंवा त्यामागील विज्ञानही आपल्याला माहीत नसतं. पण त्यावर अंधपणे विश्वास ठेवत आपण त्याचा सल्ला ऐकतो. असं असलं तरी त्यामागे एक प्रक्रिया असते आणि अनेक शास्त्रज्ञांचा, इंजीनियरचा सहभाग असतो. सॅटेलाइट निर्माण करून तो अवकाशात सोडणे आणि त्यानुसार पृथ्वीवरील सर्व Geographical परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं.
ज्याप्रमाणे GPS हे आपल्या भौगोलिक सद्यस्थितीची माहिती देत असतं, योग्य दिशादर्शक असतं त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे आपल्या आयुष्यात एक दिशादर्शक म्हणून काम करू शकतं. प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या तपस्येनंतर आणि आधुनिक काळातील संशोधकांच्या अभ्यासानंतर ज्योतिषशास्त्र आज एक परिपूर्ण शास्त्र म्हणून आपल्यासमोर एक मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहे. आपला जन्म जरी आपल्या हातात नसला तरी आपलं आयुष्य कसं असावं याबद्दल आपला अट्टहास उपयोगी पडू शकतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पाच महत्वाच्या गोष्टी असतात ज्यापासून सुख मिळावं अशी त्याची अपेक्षा असत. त्यापैकी आयुष्यात सर्वात आधी येतं ते शिक्षण! त्यानंतर आरोग्य! मग धनसंपत्ती. त्यानंतर घर. आणि या सगळ्यात महत्वाचं असतं ते कुटुंब व कौटुंबिक नातेसंबंध!
ज्योतिषशास्त्रात या सर्व बाबतील उत्तम मार्गदर्शन मिळू शकतं. ज्योतिषशास्त्र तुम्हाला तंतोतंत भविष्य सांगत नाही आणि तशी अपेक्षाही कोणी ठेऊ नये. कारण आपली कर्मचं आपलं भविष्य ठरवत असतात. पण ज्योतिषशास्त्र आपल्याला समाधानी आयुष्याचे मार्ग दाखवू शकतं. कोणत्या मार्गावर खाचखळगे आहेत, कुठे आपण सावध असलं पाहिजे, कुठे सुसाट वेगाने धावलं पाहिजे, कधी विश्रांती घेतली पाहिजे, कुठे काळजी घेतली पाहिजे या सर्वांची माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्रातून मिळू शकते.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष सुरू होतो तो शिक्षणापासून! आपल्याकडे लहानपणापासून शिक्षणाच्या बाबतीत दबाव पाहायला मिळतो. पण शिक्षण हे असं क्षेत्र आहे जेथे आवडीतून निवड झाली तर त्यात प्रचंड यश मिळू शकतं. आपण असे अनेक मुलं-मुली बघतो जे सर्व सोयीसुविधा असूनही त्यातून त्यांना शिक्षणात यश मिळत नाही. कारण त्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण मिळत नसल्याने त्यांचा त्यात रसच नसतो. जर त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला आणि त्यांचा रस, आवड, गती कशात आहे हे जर समजलं तर त्यांना योग्य वेळी योग्य शिक्षण देण्याची सोय करता येते. आपल्या शिक्षणावरच आपलं भवितव्य घडत असतं. त्याच्याबद्दल जर योग्य दिशा समजली तर संपूर्ण आयुष्यात त्याचा मोठा फायदा होतो.
शिक्षणानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तो पैसा! पैसा ही आजच्या काळाची गरज आहे असं म्हणता येईल. कारण पैसा असेल तरच तुम्हाला समाजात प्रतिष्ठा असते आणि आणि सुखवस्तू आयुष्य जगता येतं. पण पैसा प्रत्येकाच्या नशिबी नसतो. कितीही मेहनत केली तरी त्यात यश येत नाही. असं अनेकांसोबत होत असतं. याचा जर व्यवस्थित विचार केला तर यातूनही सुटका मिळवता येते. ग्रहांची पत्रिकेतील स्थिति पाहून योग्य वेळ आणि संधीची माहिती मिळाली तर यश मिळवणे अशक्य नाही. अर्थात, त्यासाठी मेहनत आवश्यक आहेच. पण कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल ज्योतिषशास्त्र आपल्याला फायदेशीर ठरू शकतं.
प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं. स्वतःचं घर असावं! समाधानी आयुष्य जगत असताना स्वतःचं संपन्न घर असणं आवश्यक मानलं जातं. शिवाय ते घर वास्तुशास्त्राला अनुसरून असेल तर आयुष्य समाधानाने जगणं शक्य होतं. पण अनेकांना वास्तुसुख नसतं. काहींकडे पैसा नसल्याने घर घेणं शक्य होत नाही तर काहींकडे पैसा असूनही चांगली वास्तु मिळत नाही. चांगल्या वास्तुचा योग जुळून आला पाहिजे असं म्हणतात. ज्योतिषशास्त्र या बाबतीतही पूर्ण समाधान करू शकतं. कुंडलीत वास्तुयोग केंव्हा आहे याचा अभ्यास करून त्या काळात चांगल्या वास्तुसाठी प्रयत्न केले तर ती मिळतेच मिळते! येथेही ज्योतिषशास्त्र आपल्याला GPS प्रणाली प्रमाणे आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जाते.  


सोमवार, ६ एप्रिल, २०२०

लॉक डाउन, आपली वास्तू आणि घ्यावयाची काळजी


मित्रांनो, सध्या कोरोना विषाणूचा उत्पात सुरू असल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात Lockdown ची अंमलबजावणी केली जात आहे. पुढील एक महिना तरी आपल्या सर्वांना आपल्या वास्तुतच बंदिस्त होऊन रहावं लागणार आहे. गेल्या अनेक ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेत आलो आहोत की वास्तू ही त्या वास्तूत राहणाऱ्या सर्वांवर परिणाम करत असते. आता तर आपल्याला त्याच वास्तूत सलग रहायचं आहे. याच निमित्ताने आज आपण काही वास्तू टिप्स जाणून घेऊया जेणेकरून आपली वास्तू दोषमुक्त होण्यास मदत होईल. छोटे-छोटे बदल करून आपण अनेक आजारांना उंबरठ्याबाहेर ठेऊ शकतो आणि सध्या जे "Work From Home" करत आहोत त्यातही कार्यक्षमपणे यशस्वी होऊ शकतो.

सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत.

घरातील जी अडगळ आहे त्यापासून मुक्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असतं. जर घराच्या आग्नेय किंवा ईशान्येकडील कोपऱ्यात अडगळ असेल तर तातडीने ती मोकळी करावी. त्याची जागा घराच्या नैऋत्येस आहे.

घरात सकाळचा सूर्यप्रकाश येणे फार आवश्यक असते. त्यामुळे पूर्वेकडील दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवाव्या. दक्षिणेकडे असलेले दरवाजे, खिडक्या बंद ठेवाव्यात. उत्तरेकडील खिडकी, दरवाजे उघडे ठेवणेही उपयुक्त ठरते. एकंदरीत, घरात स्वच्छ व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी हवा खेळती राहिली पाहिजे यासाठी हे प्रयत्न असतील.

रोगाशी लढायचं असेल तर आपली प्रतिकारशक्ती वाढवणेही गरजेचे आहे. त्यासाठी नित्यनेमाने सकाळी पूर्वेकडे तोंड करून प्राणायाम व योगासने करावीत. याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.

घरातील जेष्ठ व्यक्तींची अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे असते. घरातील जेष्ठांची झोपण्याची जागा ही शक्यतो उत्तर-पश्चिम दिशेने असणे आवश्यक आहे. त्यांना इमारतीच्या पीलरजवळ, जिना किंवा बीम अशा रचनेखाली झोपू अथवा बसू देऊ नये.

रात्री झोपत असताना दक्षिणेकडे डोकं करून झोपण्याचा सल्ला आपले वाडवडील आधीपासूनच देत असतात. वास्तुशास्त्रात याचंही शास्त्रीय विवेचन करण्यात आले आहे. असं केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण योग्य राहतं, झोप चांगली लागते व दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते.

वास्तूतील आग्नेय व ईशान्य दिशा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आग्नेय ही अग्नीची दिशा आहे तर ईशान्य ही जलतत्वाशी बांधील आहे. ईशान्येकडील खोलीत झोपणे, काम करणे सर्वथा टाळावे. आग्नेय दिशेस जर तुपाचा दिवा प्रज्वलित केला किंवा कापूर वडी लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. जर हे दोन तत्व असंतुलित असतील तर आरोग्य समस्या वाढू शकतात. त्यामुळे वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन यावर उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरेल.

याशिवाय घरात बांबूचे रोप आणून ठेवणेही फायद्याचे ठरते ज्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. तुळशीचे रोप हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. वास्तुशास्त्रात त्याचेही संदर्भ आढळतात. घरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कृष्णतुळस असावी.

घरातील हवा शुद्ध राहावी आणि घराचे निर्जंतुकीकरण व्हावे यासाठी घरच्या आग्नेय कोपर्‍यात तुपाचा दिवा लावला तर फायदा होऊ शकतो. याशिवाय, कापूर प्रज्वलन हेसुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो.

जी मंडळी सध्या घरात बसून काम करत आहेत त्यांनी उत्तर दिशेकडे तोंड करून काम करावे. घराच्या वायव्य कोपऱ्यात बसून काम केले तर अजून फायदा होऊ शकतो.

जी मंडळी Work From Home करत आहेत त्यांना स्वतःची मनस्थिती जपणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशात बसून काम करणे उत्तम होईल. त्यासोबत उत्तर व पूर्व दिशेला असलेला दरवाजा, खिडकी उघडी ठेऊन काम करावे.

वास्तुशास्त्रात आरोग्यसंपदा व अर्थसंपदा याबाबत सखोल माहिती दिली आहे. त्याचे योग्य अनुकरण केले तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवून आणता येऊ शकतो. येथे केवळ वास्तुशास्त्रात नमूद असलेल्या टिप्स आहेत. वास्तुशास्त्रात यापेक्षा अजून बरेच उपाययोजना आहेत ज्यांचं अनुकरण केलं तर त्याचा मोठा लाभ आपल्याला होऊ शकतो. पण त्यासाठी वास्तूशास्त्रतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.