बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि वस्तूदोषाचे परिणाम ...

 वास्तूशास्त्र म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या शब्दाची फोड केली तर आपल्याला त्यातून उत्तर मिळेल. ‘वास्तू’ म्हणजे मानवनिर्मित अशी जागा जी माणसाने स्वतःच्या निवाऱ्यासाठी कृत्रिमरीत्या बांधलेली आहे. जगात जी ठिकाणं नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्याला आपण वास्तू म्हणून संबोधत नाही. आता ‘शास्त्र’ म्हणजे काय? तर वर्षानुवर्षे अभ्यास करून एखादी विद्या संपादन करणे आणि त्या अभ्यासपद्धतीद्वारे विशिष्ट समस्यांवर उपाययोजना करणे म्हणजे शास्त्र. जसं वैद्यकीयशास्त्र असतं, संगणकशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं,प्राणीशास्त्र असतं तसच वास्तूशास्त्र! जर आपल्याला शारीरिक अर्थात आरोग्याची तक्रार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो आणि तो डॉक्टर (वैद्य) संपूर्ण तपासणी करून प्रचलित आणि सिद्ध झालेल्या वैद्यकीय शास्त्राच्या आधारे इलाज करत असतो. या अभ्यासपद्धतीमध्ये वास्तविक घटनांचे निरीक्षण व तर्काधिष्ठित परीक्षण करून प्रत्यक्षात सिद्ध करण्याजोग्या परिणामांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.त्याचप्रमाणे आपल्या वास्तूत काही दोष असतील आणि त्याचा दुष्परिणाम होत असेल तर वास्तुशास्त्राच्या प्रचलित व सिद्ध नियमांनुसार त्यावर उपाययोजना करता येतात.

वास्तुशास्त्रात दहा दिशा, पंचमहाभूते, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय ऊर्जा, सूर्याची किरणे व वैश्विक ऊर्जेचा प्रामुख्याने अभ्यास करून आपली वास्तू कशी असावी याबद्दल संकेत दिले आहेत. ज्यावेळी आपण वास्तू स्थापित करतो त्यावेळी या ऊर्जेची विभागणी होते आणि ऊर्जेचे प्रवाह अस्थिर होतात. अर्थातच या सर्व घटकांचा परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येकावर होत असतो. 
ज्याप्रमाणे वाहणार्‍या नदीला बांध घातला तर प्रवाही नदी थांबते त्याप्रमाणे वास्तुच्या रचनेमुळे प्रवाही ऊर्जा व इतर घटक तिथे बंदिस्त होतात.

वास्तूमध्ये दोष असणे म्हणजेच वास्तूच्या रचनेमुळे आणि वास्तूमधील मांडणीमुळेसतत प्रवाहित असणाऱ्या उर्जेचे असंतुलन. म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा वास्तूमध्ये जास्त वावर आणि सकारात्मक ऊर्जेला झालेला प्रतिबंध. ज्यावेळी त्या वास्तूचा सखोल अभ्यास करून वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार त्याची रचना केली जाते तेंव्हा हा दोष दूर करता येतो.

उदाहरणार्थ, ईशान्य दिशा सकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे आणि नैऋत्य दिशा नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे. मग ईशान्य दिशेकडून येणार्‍या सकारात्मक दिशेला कमीत कमी अवरोध व्हावा म्हणून ती दिशा प्रशस्त व मोकळी ठेवता येईल. याविरुद्ध,नैऋत्य दिशेने येणारी नकारात्मक उर्जेला प्रतिबंध व्हावा म्हणून तिकडे अडगळ करता येईल.

वास्तुतील दोषामुळे काय काय परिणाम होऊ शकतात हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. खरं तर हे प्रत्येक वास्तूच्या रचनेवर अवलंबून असतं. कोणत्या दिशेच्या असंतुलित असल्याने कोणती नकारात्मक ऊर्जा अधिक निर्माण होते यावर ते अवलंबून असतं.पण साधारणपणे, घरामधील माणसांची सततची आरोग्याची समस्या, घरात पैसे (अर्थात लक्ष्मी) न येणे किंवा पैसे न टिकणे, सततच्या आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, लग्न न जमणे, मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, करिअर संबंधित अडचणी, यश न येणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना वास्तूतील दोष कारणीभूत असू शकतात.
बर्‍याचदा वास्तू दूषित असल्यास त्याचे यापेक्षाही गंभीर परिणाम भोगावे लागतात. मानसिक आरोग्यावर त्याचा तीव्र परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या जटिल होऊन अकाली मृत्यूही ओढवतात. कितीही प्रयत्न केले तरी हातातोंडाशी आलेलं यश एका क्षणात अपयशात रूपांतरित होतं. मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि होत्याचं नव्हतं होतं. वास्तू दूषित असेल तर असे प्रकार घडतात याला अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रसंग आहेत आणि त्याचा अनुभव घेणारे जीवंत माणसंही आहेत.

मानवी शरीर हेसुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे आणि मानवी मनावर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. लक्षावधी किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण लहरींमुळे अथांग सागराला उधाण येतं तर मानवी मनावरही या वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण इत्यादींचा परिणाम होतच असतो. आपलं शरीर निरोगी राहावं यासाठीकाळजी घ्यावी लागते तसेच आपण जिथे वास्तव्यास असतो त्या वास्तूचीही काळजी घेतली तर तीही तितकीच सदृढ राहील. जर शरीराला व्याधी झाली तर डॉक्टरकडे जावं लागतं तसं वास्तूत दोष असतील तर ते वास्तूशास्त्र तज्ञाकडे जाऊन त्यातील दोष नाहीसे करून घेणं गरजेचं आहे.

शास्ति च त्रायते च। शिष्यते अनेन।

अर्थात,जी अभ्यासपद्धती आपल्याला शिस्त लावते, आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करते, आपलं रक्षण करते त्याला शास्त्र म्हणतात! त्या शास्त्राने दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपल्या आदर्श जीवनशैलीचा भाग आहे.
*-*-*

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

ज्योतिषशास्त्र आणि करियर - आपण योग्य करियर निवडीसाठी ज्योतिषशास्त्राची कश्याप्रकारे मदत घेऊ शकतो


प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. काहीही झालं तरी आपला मुलगा किंवा मुलगी आजच्या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. आपली अपूर्ण स्वप्ने आपल्या मुलांनी पूर्ण करावीत हे आई-वडिलांचं स्वप्नं असतंच. त्यासाठी मग आई-वडील आपल्या मुलांना त्यांनी नेमलेल्या मार्गावर चालायला लावत असतात. कधी शेजारच्या पांडेच्या मुलाला सरकारी नोकरी लागगल्यावर त्या कुटुंबाची झालेली भरभराट आई-वडिलांच्या डोळ्यासमोर असते तर कधी नात्यातील कोणीतरी एखाद्या टीव्ही शो मध्ये जाऊन सगळ्या नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र ठरलेलं त्यांनी पाहिलेलं असतं. मग हेच यश, हीच लोकप्रियता आपल्या मुलांच्या वाटेला यावी असं पालकांना वाटत असतं. त्यालाच यश समजून आई-वडील आपल्या मुलांना त्या मार्गावरील स्पर्धक बनवतात.
प्रत्येक कुटुंबाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. काही कुटुंबात आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठीचा भार घरातील पुढच्या पिढीच्या खांद्यावर असतो. आपल्या मुलांनी लवकर शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी असं एकच स्वप्नं घेऊन पालक जगत असतात.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की आपल्याकडे शिक्षण हा व्यक्तीगत आवडीचा आणि क्षमतेचा विषय नसून तो कौटुंबिक आकांक्षा व सामाजिक प्रतिष्ठेचा विषय आहे. मुलांना कोणत्या विषयात रस आहे, कोणत्या विषयात गती आहे आणि तो कोणत्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्यरत राहून यश प्राप्त करू शकतो याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. बर्‍याचदा कला क्षेत्रात आवड आणि गती असलेल्या मुलाला आई-वडिलांच्या हट्टामुळे म्हणा किंवा मित्रांच्या बरोबरीने अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यावं लागतं. पण त्या विषयात त्यांचा रस नसल्याने त्यांची प्रगति खुंटते. मग विनाकारण त्या क्षेत्रात तगून राहण्याचा अट्टहास सुरू होतो. दुर्दैवाने, स्वतःची आवड, स्वतःच्या मर्यादा आणि मुख्य म्हणजे स्वतःचे उपजत गुण माहीत नसल्याने त्या मुलाचं आणि सोबतच त्या कुटुंबाचं भवितव्य अधांतरी राहतं.
हे केवळ एक उदाहरण आहे. ज्यांचा स्वभाव कमी बोलण्याचा असतो त्यांना मार्केटिंग क्षेत्रात यश मिळवता येईल का? ज्यांचा स्वभाव चंचल आहे त्यांनी प्रचंड एकाग्रता लागणार्‍या शल्य चिकत्सक क्षेत्रात पाऊल टाकावं का?
यावरून एक स्पष्ट आहे की मुलांनी त्याच क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि करियर करावं ज्या क्षेत्रात त्यांना आवड असेल आणि गती असेल. येथे महत्व प्राप्त होतं ते Career Counseling अर्थात करियर समुपदेशन किंवा मार्गदर्शन! मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण, त्यांची आवड, जन्मतः मिळालेले गुण-दोष आणि त्यांच्या एकंदरीत स्वभावगुणांच्या अनुषंगाने सोपे असणारे क्षेत्र शोधून त्यांना त्या मार्गावर वाटचाल करायला लावणे.
कुंडलीमध्ये विविध ग्रह असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्या प्रत्येक ग्रहाचा एक कार्यकारण भाव असतो. कोणता ग्रह कोणत्या स्थानी असल्यावर त्याचा मनुष्यावर कसा परिणाम होतो हेसुद्धा निश्चित असतं. जसा माणसाचा एक गुणधर्म असतो तसा ग्रहांचाही असतो. कार्यक्षेत्राच्या बाबतीत सांगायचं तर जसा शुक्र ग्रह कला, साहित्य या क्षेत्रांशी निगडीत आहे. गुरु ग्रह बुद्धीशी निगडीत कार्यक्षेत्राशी संबधित आहे. हे ग्रह आपल्या पत्रिकेत कोणत्या स्थानी आहेत त्यानुसार आपली आवड, आपला स्वभाव, आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा ठरत असतात. याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्या मुलाने-मुलीने करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे हे ठरवल्यास पुढील वाटचाल सोपी होते.
काही वेळा सर्व काही योग्य असूनही यशप्राप्ती होत नसते. त्याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते. याअनुसार, ग्रहांच्या स्थितीचा त्या व्यक्तीवर असा काही परिणाम होत असतो की तो विशिष्ट काळ त्या व्यक्तीसाठी खडतर असतो आणि त्या कालावधीसाठी हवं असलेलं प्राप्त करणं कठीण असतं.
आजच्या जगात कार्यक्षेत्र म्हणून आपल्यासमोर अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यातील नेमका कोणता आपल्यासाठी उचित आहे हे या समुपदेशनातून जाणून घेता येईल. ग्रहांच्या दशेवरुन योग्य दिशा जाणून घेणे हे काम आपल्याला करायचं असतं.
आपण जेथे कार्यरत असतो आणि तेथे यश मिळत नसेल तर आपण निवडलेला प्रांत चुकीचा आहे असं नंतर वाटू शकतं. मग पुन्हा परिस्थितीच सुरुवातीपासून अवलोकन केलं जातं आणि शेवटी ज्ञात होतं की आपण जे करतोय त्यासाठी बनलेलोच नाहीत. मग सगळी चक्र उलटी फिरवावीशी वाटतात. कधी कधी इतका उशीर झालेला असतो की परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. हे सगळं टाळण्यासाठी आधी आपण स्वतःबद्दल जाणून घेऊन योग्य दिशेने वाटचाल सुरू केली तर आपल्या आयुष्यचं गलबत चुकीच्या मार्गाने जाणार नाही.