सोमवार, १३ जानेवारी, २०२०

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग २

 मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या.
 ज्योतिषशास्त्र खरं की खोटं यावर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाद होतात. पण ज्योतिष हे शास्त्र आहे. जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादि आहेत तसेच ज्योतिषशास्त्र आहे. भविष्यात होणार्‍या अनुकूल किंवा प्रतिकूल घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक गणिती पद्धत अवलंबली आहे. ही पद्धत हजारो वर्षांपासून अवलंबली जाते. आजच्या काळात शेअर बाजारातही अशा काही पद्धती वापरल्या जातात ज्यातून शेअर्सचे भाव वाढणार की पडणार याबद्दल भविष्य वर्तविलं जातं. तोसुद्धा विविध माहितीचे विश्लेषण करून एक प्रकारचा अंदाजच वर्तविला जातो जेणेकरून गुंतवणूकदारांना सतर्क राहता यावे. ज्योतिषशास्त्राचा हेतुही तोच आहे. त्यामुळे काळाच्या कसोटीवर ज्योतिष हे शास्त्र म्हणून सिद्ध झालं आहे.
याबद्दल अलीकडेच एक उदाहरण द्यायचं झालं तर... एका पर्यावरणवादी अभ्यासकाने असं सिद्ध केलं की जगाच्या एका कोपर्‍यात काही फुलपाखरांनी आपले पंख फडकावले नाहीत किंवा त्यांचं योग्य ऋतुत स्थलांतर झाले नाही तर त्यामुळे पर्यावरणावर मोठे परिणाम पडतात. यालाच जोडून सांगायचं तर, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण लहरीमुळे समुद्राला भरती-ओहोटी येतेच. त्याचप्रमाणे योग्य विश्लेषण केल्यास ग्रहांची स्थिति मानवी आयुष्य बदलण्याची शक्ति ठेवते.

ज्योतिषशास्त्राचे महत्व
प्रत्येकाला स्वतःच्या विवंचना असतात. आयुष्य जगत असताना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत असतो. आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने जात आहे हेही कधी-कधी लक्षात येत नाही. अथांग समुद्रात एकट्याच भरकटणार्‍या एखाद्या नावेप्रमाणे ते जिकडे प्रवाह असेल त्या दिशेने वाहत जात असतं. कारण काय चुकत आहे आणि काय केलं पाहिजे या दोन प्रश्नांची उत्तरेच मिळत नाहीत. माणसाचं आयुष्य हे एकट्याचं नसतं तर त्याच्या कुटुंबावरही त्याचा परिणाम होत असतो. या सर्व प्रश्नांचा मागोवा घेऊन उत्तरापर्यन्त पोहोचण्यात आपल्याला ज्योतिषशास्त्र मदत करू शकतं. आपल्याला आरोग्याच्या समस्या असतील, वैवाहिक प्रश्न, आर्थिक चणचण,नोकरीची चिंता,मनशांती मिळत नसेल,सतत अपयश व अवमानाचा सामना करावा लागत असेल,इतरांच्या त्रासाने जीवन नकोसं वाटत असेल अशा छोट्या ते मोठ्या प्रत्येक अडचणीवर मार्ग काढताना ज्योतिषशास्त्र उपयुक्त ठरू शकतं.
आधी नमूद केल्याप्रमाणे,ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरुन मानवी आयुष्यावर होणारे परिणाम शोधले जातात. प्रत्येक ग्रहाचा एक गुणधर्म आहे. काही ग्रह कलेला पूरक आहेत, काही कर्तव्याला, काही बुद्धीला तर काही आरोग्याला. ते ग्रह सध्या कोणत्या कक्षेत आहेत, कोणत्या नक्षत्रात आहेत हे पाहणे महत्वाचे ठरते. व्यक्तीची जन्मवेळ व ठिकाण अचूकपणे माहीत असेल तर त्याच्या जन्माच्या वेळेस ग्रहस्थिती कशी होती आणि आज कशी आहे याचे विश्लेषण केले जाते. आजची ग्रहांची स्थिती अनुकूल आहे की प्रतिकूलयाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार कोणता ग्रह त्रासदायक ठरत आहे, अडचणी निर्माण करत आहेहे निष्पन्न झाल्यास त्यावर काय उपाययोजना करता येतील हे पहावे लागते. कोणते ग्रह कोणत्या कालावधीत चांगलं फळ देऊ शकतात याचाही अभ्यास करता येतो ज्याच्या अनुसार निर्णय घेणं सोपं जातं.
कुठलेही एका जागी ग्रह स्थिर असत नाहीत. त्यांचं स्वतःभोवती परिवलन आणि सूर्याच्या भोवती परिभ्रमन सुरू असतं. कधी-कधी हे ग्रह एकमेकांच्या सरळ रेषेत येतात तर कधी विशिष्ट कोनातून प्रवास करत असतात. त्यांचं एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेतील भ्रमण सुरूच असतं. ग्रहांचं हे संक्रमण मोठं स्थित्यंतर घडवणारं असतं. कधी ते मानवी स्वभावातील सय्यम पहातं, कधी चिकाटी, कधी मोह, व्यसन, प्रामाणिकपणा, हुशारी, सचोटी तर कधी त्याग! जर माणसाला समजलं की ही स्थिति किती काळ टिकणार आहे तर तो कधी सावध तर कधी निश्चिंत राहू शकतो.
आमच्या पाहण्यात एक व्यक्ति होते ज्यांची कागदनिर्मितीचा कारखाना होता. काही कारणास्तव तो व्यवस्थित चालत नसल्याने ते चिंतित होते. त्यांनी आपली पत्रिका बनवून घेतली आणि ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला. त्यांची जन्मपत्रिका व सद्यस्थिती पाहिली तर असा निष्कर्ष निघाला की पुढील दहा महीने कष्ट देणारे असणार आहेत. पण त्यांनी चिकाटी दाखवली आणि व्यवसाय सांभाळला तर त्यानंतर खूप चांगले दिवस येऊ शकतात. त्यांनी तो निष्कर्ष ऐकला आणि अनुकरण सुरू केलं. पुढील सर्व काळ ते इतर व्यवसायातून अर्थार्जन करून आपला कागदाचा व्यवसाय जपत होते. आणि आश्चर्याची बाब म्हणजे दहा ते अकरा महिन्यांच्या नंतर प्लॅस्टिकबंदी झाली आणि कागदाला मागणी वाढली. त्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढला. हा केवळ योगायोग नव्हता. त्यांच्या आयुष्याबद्दल मिळालेल्या संकेताच्या आधारे विचारपूर्वक अवलंबलेला मार्ग होता. याचा अर्थ असा होत नाही की प्लॅस्टिकबंदी होणार हे पत्रिकेतून समजलं होतं, पण सद्यस्थितीत त्यांचे ग्रह अनुकूल नव्हते आणि दहा महिन्यांनी त्यांना अनुकूल असणारी घटना घडणार होती. तोपर्यंत त्यांना सय्यम बाळगावा लागणार होता. जर प्लॅस्टिकबंदी झाल्यावरही ते ग्रहस्थ आराम करत बसले असते तर तो त्यांचा दोष होता, पण त्यांना अनुकूल असणारी घटना घडताच त्यांना जोमाने कष्ट करणे गरजेचे आहे. त्यांना दिशा देण्याचं काम ज्योतिषशास्त्राने केलं. अशा पद्धतीने दिशा देण्याचं आणि निर्णय घेताना उपयुक्त ठरणारं भविष्य ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेता येतं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा