शनिवार, २१ मार्च, २०२०

वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र यामुळे आपल्या जीवनात होणारे फायदे


ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.
गायत्री मंत्राच्या या ओळी आयुष्याला मार्ग दाखवणार्‍या आहेत. याच प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल आयुष्य सुकर करते!

आजपर्यंत विविध ब्लॉगच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली. कुठल्याही शास्त्राचीउत्पत्तिहीमानवी जीवनाला सुरक्षिततेकडे व संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठीच झालेली असते. आपण ज्या शास्त्रांच्या संदर्भात चर्चा केली त्यांच्यातसुद्धा हाच समान दुवा आहे. या सर्व शास्त्रांच्या सहाय्याने आपण सुरक्षित वसंपन्न आयुष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो!
मनुष्यप्राणी दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो, शिक्षण घेत असतो,नोकरी-व्यवसाय करत असतो ते आपल्यासह आपल्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच. भविष्याची चिंता ही माणसाला फार पूर्वीपासूनच सतावत आली आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच हा सारा अट्टहास सुरू आहे. या स्पर्धेच्या जगात आणि अस्तित्व टिकवण्यासाठीच नव्हे तर दाखवून देण्याच्या काळात वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र हे सर्व आपल्या फायद्याचेच ठरत असतात. प्रत्येकाची स्वप्नं सारखी नसतात आणि सुखाची व्याख्याही सारखी नसते. कोणासाठी पैसा महत्वाचा असतो, कोणासाठी ज्ञान, कोणासाठी नातेसंबंध तर कोणासाठी छंद! ती स्वप्नं पूर्ण करून समाधानाने जगण्यासाठीच त्याची धडपड सुरू असते. जन्म आणि मृत्यू मानवाच्या हातात नसतात पण त्यादरम्यानचा जीवनाचा प्रवास मात्र माणूस स्वतःची ही स्वप्नं पूर्ण करण्यात मग्न असतो. या सगळ्यात वरील सर्व शास्त्र कशा पद्धतीने प्रभावीपणे भूमिका बजावू शकतात ते जाणून घेऊ!
आपल्या जन्मानुसार आपली जन्मपत्रिका बनते आणि त्यानुसार ज्योतिषशास्त्र आपल्याला आयुष्यातील विविध टप्प्यावर मार्गदर्शन करत असतं. आपलं जेंव्हा नाव ठेवलं जातं त्याच्या अनुसार आपल्याला अंकशास्त्रतून मार्गदर्शन मिळवता येतं. माणूस ज्या वास्तूत राहतो त्यानुसार वास्तुशास्त्रचा अभ्यास करून त्याला विविध समस्यांची सोडवणूक करता येते. माणसाचा स्वभाव जसा असतो त्यानुसार त्याला यश-अपयश मिळत असतं. जर स्वभावातील दोष कमी करून गुणांची वारंवारता वाढवायची असेल तर रत्नशास्त्राचा मोठा आधार आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतलेलं प्रत्येक शास्त्र आपल्याला उपयुक्तच ठरत असतं.

          आपण या सर्व शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली आहे. या प्राचीन शास्त्रांचा योग्य उपयोग करून घेतला तर आपल्याला आयुष्यातील अनेक कटू प्रसंग टाळता येतात आणि समाधानाने जीवन जगण्यास मदत होते. आयुष्यात अनेक अशा घटना असतात ज्याला नेमकी कारण काय आहेत याचं स्पष्टीकरण मिळत नसतं. मग ते आरोग्य, धन यांची प्राप्ती न होणं असेल किंवा त्याचा क्षय होणं असेल. शिक्षण व करियरमध्ये मार्ग न सापडणे असेल किंवा वाट सापडूनही यश न मिळणे असेल. विवाह, संतती, कौटुंबिक नातेसंबंध या नाजुक बाबीही विनाकारण क्लेशदायक ठरत असतात. हे आपल्यासोबतच का होतं? याचं उत्तर सापडत नसल्याने नैराश्य येऊ शकतं आणि आयुष्य चुकीच्या दिशेने भरकटत जाऊ शकतं. आयुष्याच्या अशा अंधारलेल्या वाटेवरून जात असताना या सर्व प्राचीन विद्या आपल्याला प्रकाशवाट दाखवू शकतात. सावध वाटचाल करणे नेहमीच फायद्याचे ठरते. प्रश्न कुठलेही असोत, त्यावर उत्तरं असतातच. आपल्याला योग्य निर्णय घेऊन त्यातून मार्ग शोधावा लागतो. मुख्य म्हणजे या सर्वमध्ये आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. कधी वास्तुशास्त्रातून मार्ग मिळतील तर कधी अंकशास्त्र मदत करेल. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, आयुष्य वेगळं आहे, राहणीमान वेगळं आहे आणि अपेक्षाही वेगळ्या आहेत. असं असताना सर्वांना एकच उपचार लागू होणार नाहीत. समस्या कुठे आहे आणि अपेक्षा काय आहेत त्याचा अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. अनेकांची आयुष्यं यामुळे बदलून गेली आहेत. त्याची वाच्यता कधी उघडपणे केली जाते तर कधी त्या गोष्टी फक्त परिणाम दाखवत असतात.
                   या शास्त्रांची मदत घेत असताना महत्वाचा आहे तो तज्ञांचा सल्ला. हे विषय वाचून समजतील आणि केवळ वाचलेलं, ऐकलेलं अवलंबून समस्या सुटतील हे गैरसमज आहेत. आमचे आत्तापर्यंतचे ब्लॉग असतील किंवा इतर माध्यमातून मिळणारी माहिती ही वस्तुस्थितीचं आकलन करून देणारी असते. या विषयाचे महत्व सांगणारी व जागरूकता निर्माण करणारी असते. त्यातून आपल्याला मार्ग दिसेल. पण अनुकरण करायचं असेल तर मात्र योग्य व्यक्तीची, तज्ञांची, विशारदाची आवश्यकता असते. कारण लहानसा खोकला असताना घरी केलेले उपचार गुण दाखवतीलही, पण रोगाची-आजाराची व्याप्ती जाणून घेऊन त्यावर नेमका उपचार करण्यासाठी जसा स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो तशातील हा प्रकार आहे. आपल्या वास्तूतील दोष, पत्रिके अनुसार मार्गदर्शन, स्वभावदोषांच्या अनुषंगाने राशीरत्न निवड असेल किंवा हस्तरेषा व अंकशास्त्रानुसार प्रश्नांची सोडवणूक असेल इत्यादी हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यासचं त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं आणि अज्ञानी माणसाचा सल्ला हा त्याहूनही अधोगतीकडे नेणारा असतो. त्यामुळे वेळीच विचार करून निर्णय घ्यावा आणि उत्कर्ष साधावा!!!



बुधवार, १८ मार्च, २०२०

वास्तुशास्त्र आणि ऑफिस



कुठलीही मानवनिर्मित जागा ही वास्तु असते. त्या वास्तूच्या रचनेनुसार एकतर ती वास्तु लाभते किंवा त्या वास्तूत दोष तरी असतो. आजपर्यंत आपण वास्तूमध्ये घर, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं कायम वास्तव्य असतं याबद्दल बोलत आलो आहोत. पण आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात काम करणार्‍या पुरुष अन स्त्रियांचा बराचसा वेळ कार्यालयात अर्थात ऑफिसच्या ठिकाणी जात असतो. नोकरी अथवा व्यवसाय करताना जी जागा आपण प्रत्यक्षात वापरतो त्याला आपण ऑफिस म्हणूयात! मग तुम्ही एखाद्या बँकेत नोकरी करत असाल, आयटी क्षेत्रात नोकरी करत असाल, स्वतःचं ऑफिस असेल किंवा दुकान असेल अशा प्रत्येक ठिकाणी वास्तु ही आपलं काम करतच असते. मग ते काम इष्ट फळ देण्याचं असो किंवा अनिष्ट!आणि त्यानुसारच तुमच्या पदरी यश-अपयश पडत असतं.
            ऑफिस हे आपल्या आर्थिक प्रगतिचे आणि आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारं स्थान आहे. तुम्ही जिथे काम करत असता त्या वास्तूत जर दोष असतील तर तुम्हाला आर्थिक प्रगती करताना अडथळे येऊ शकतात. कारण ज्या ठिकाणी आपल्या शारीरिक व बौद्धिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर होतो अशी ती जागा असते. त्यामुळे तेथे काम करत असताना जर सुयोग्य स्थिती नसेल तर त्यातून मिळणारे परिणामही फार सकारात्मक असणार नाहीत. वास्तुस्त्रातील अभ्यासानुसार,तुम्ही काम करताना कोणत्या दिशेकडे पाठ करून बसता, तुमचा टेबल ऑफिसच्या कोणत्या कोपर्‍यात आहे, तुमच्या आजूबाजूला खिडकी-दरवाजा आहे का अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबींवर तुमचं त्या क्षेत्रातील यश-अपयश अवलंबून असतं.
तुम्ही असे काही अनुभव नक्की बघितले असतील की जेथे एखादा व्यक्ति नव्यानेच व्यवसाय सुरू करतो, दुकान सुरू करतो आणि अगदी अल्पावधीतच त्याला यश मिळू लागतं. यामध्ये त्या व्यक्तीची मेहनत तर नक्कीच असते पण त्याला साथ लाभते ती त्याच्या व्यवसायाच्या वास्तुचं संपन्न असणं. कधी कधी वास्तूची रचना अनपेक्षितपणे इतकी उत्तम असते की त्यामूळे अविश्वासनियरित्या वृद्धी होऊ लागते. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करत असाल तर तुमच्या सोबतचा व्यक्ति पुढे निघून जातो, त्याचे प्रमोशन होतात, बॉससोबत त्याचे फार खटके उडत नाहीत पण तुम्ही मात्र आहे तिथेच अडकून राहता. तुम्हाला छोट्या-मोठ्या बाबतीत अडचणी येऊ लागतात. काम करूनही त्याचं श्रेय मिळत नाही आणि अवहेलना सुरू असते. याला काही अंशी स्वभाव तर जबाबदार तर असतोच पण मुख्य समस्या असते ती त्या वास्तूचा तुमच्यावर होणारा नकारात्मक परिणाम. कधी-कधी वास्तूची रचना अशी असते की त्यात विशिष्ट एका दिशेला बसणार्‍या, कोपर्‍यात बसणार्‍या वगैरे व्यक्तींना नकारात्मक फलप्राप्ती होत असते. म्हणजे दक्षिणेकडील दरवाजाकडे तुमचा टेबल असणे,पश्चिमेकडे खिडकी असणे, बसण्याच्या जागेच्या अगदी वर बीम असणे किंवा ईशान्य कोपर्‍यात केबिन असणे. असे अनेक निरीक्षणे वास्तुशास्त्रात नोंदवली आहेत ज्यावरून कामाच्या ठिकाणी वास्तूची रचना कशी असावी जेणेकरून सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. जर अशा काही समस्या असतील तर अगदी छोटे-छोटे बदल करून तुम्हाला परिस्थितीत सुधारणा घडवून आणता येते. साधं बांबूचं छोटसं रोप आपल्या टेबलवर ठेवणे किंवा बसायची खुर्ची योग्य दिशेला करून बसणे, लाकडी खुर्ची वापरणे असे उपाय केले तरी बराच फरक पडू शकतो.
ज्यावेळी भरपूर भांडवल लावून एखादा व्यवसाय सुरू केला जातो त्यावेळी वास्तुशास्त्राचा अभ्यास करून त्यानुसार ऑफिस अथवा फॅक्टरीची रचना करणे फायदेशीर ठरते. कारण ऑफिस एकदा स्थापित केलं की त्यात शक्यतो बदल करणे सोपं असत नाही. त्यामुळेच सुरूवातीलाच जर वास्तुशास्त्रत तज्ञ व्यक्तीचा सल्ला, मार्गदर्शन घेऊन ऑफिसची वास्तु उभारली तर त्याचा लाभ होऊ शकतो. बर्‍याचदा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाचा भरपूर व्याप असतो. त्यामुळे तेथे काम करणार्‍या व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतात. अशात कर वास्तुदोष असतील तर तेथे आणखीनच गंभीर समस्या उद्भवू शकतात. पण त्यात जर वेळीच योग्य बदल केले तर त्याचे सकारात्मक परिणाम खात्रीशीरपणे दिसून येतील.
वास्तुशास्त्रात सूर्यप्रकाश, स्वच्छ व खेळती हवा, गुरुत्वाकर्षण, विविध दिशांकडून येणार्‍या ऊर्जा यांचा अभ्यास असतो. आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिशेंचा एक विशिष्ट असा गुणधर्म आहे. ज्या प्रकारचं ऑफिस आहे, ज्या प्रकारचं तिथे काम होत असतं त्याप्रमाणे वास्तुची उभारणी केली किंवा त्यात बदल केले तर त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. म्हणजे जर समजा आर्थिक नियोजन किंवा अर्थकारणाशी निगडीत ऑफिस असेल तर त्या क्षेत्रात पश्चिम दिशा महत्वाची भूमिका बजावत असते. ऑफिसमध्ये Creativity संबंधित काम असतील तर त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना करता येते. वस्तूंची खरेदी-विक्री संबंधित व्यवहार त्या ऑफिसमधून होत असतील तर उत्तर व पूर्व दिशा महत्वाची ठरते. अशा अनेक बाबींचा विचार करून ती वास्तु परिपूर्ण असेल तर त्याचा निश्चितच मोठा फायदा होत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्राचा योग्य वापर केला तर आर्थिक प्रगती व सामाजिक प्रतिष्ठा यात यश मिळवणे शक्य आहे.

सोमवार, ९ मार्च, २०२०

वास्तु आणि विवाहयोग


प्रत्येक कुटुंबात सर्वाधिक आनंदाचा क्षण म्हणजे विवाह! विवाह हा कुटुंबातील आणि वास्तूमधील सर्वाधिक मंगल क्षण मानला जातो. आपल्याकडे लग्न हे केवळ दोन जीवांचं एकत्र येणं नसून दोन कूटुंब त्यामुळे एकत्र येत असतात. लग्नकार्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जात असतं. शिवाय,लग्न म्हणजे आपल्या घराण्याच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा योग असतो. पण आजच्या काळात “विवाह” ही एक मोठी समस्या बनला आहे. विवाह न जमणे आणि विवाहातून सुखप्राप्ती न होणे यामुळे लग्नसंस्थेवर विश्वास नसणार्‍यांची संख्या वाढत आहे. पण हे असं का घडत आहे याकडे कोणीही अभ्यासपूर्वक बघत नाही.
विवाहयोग नसणे ही आजच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. अनेक चांगल्या, संपन्न असलेल्या कुटुंबातील गुणी मुला-मुलींची लग्न लवकर जुळत नाहीत. सर्वकाही असून अपेक्षेसारखा जोडीदार न मिळणे यामुळे केवळ विवाहइच्छुक तरुण-तरुणीचं नाही तर त्यांचे कुटुंबियही काळजीत असतात. संपत्ती, रूप, चांगलं कूटुंब अशा सर्व जमेच्या बाजू असताना विवाह जुळत नाहीत याला वास्तूतील दोष कारणीभूत असतो. आपल्या घराची बांधणी आणि विवाहइच्छुक मुला-मुलींची राहणी या विवाह न जुळणे या अडचणीतले महत्वाचे मुद्दे आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिशेला एक तत्व आहे. जसं आग्नेय दिशेला अग्नि हे तत्व आहे. जर यातील काही तत्व असंतुलित झाले असतील तर त्या घरातील तरुण-तरुणींचे विवाह जुळणे कठीण होऊन बसते.
विवाहइच्छुक तरुण-तरुणी जर कोणत्या रंगाचे कपडे वापरतात,ते कोणत्या दिशेला झोपतात, त्यांची रूम कोणत्या दिशेला आहे, रूममध्ये कोणता रंग आहे अशा अनेक छोट्या-मोठ्या बाबींचा अभ्यास करून वास्तुशास्त्रात विवाह न जुळणे या समस्येवर उपाय सुचवले आहेत. विवाहइच्छुक जोडप्यांनी शक्यतो उत्तर किंवा वायव्य दिशेच्या रूमचा वापर केला पाहिजे आणि झोपत असताना पूर्वेकडे डोकं करून झोपले पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. शिवाय, खोलीत गुलाबी अथवा निळ्या रंगाचा वापर केला तर तेही सकारात्मक बदल घडवण्यात हातभार लावू शकतं. असं केल्याने अपेक्षित स्थळ लवकर येऊ लागतात. जर विवाहइच्छुक तरुण-तरुणी बीम असलेल्या खोलीत किंवा आग्नेय दिशेला असलेल्या खोलीत जास्तकाळ वास्तव्य करत असतील तर ते टाळले पाहिजे.
प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि विवाह करताना प्रत्येकाच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. रंग-रूप-धन असा सर्व अभाव असणार्‍यांचीही लग्नं चटकन जुळतात आणि त्यांचा सुखाने संसार होऊ लागतो. पण कधी-कधी सर्वकाही असून स्वभावामुळेही लग्न जुळण्यास मोठा विलंब होताना दिसून येतो. त्यामुळे त्या तरुण-तरुणीच्या राहणीचा अभ्यास करून वास्तूत काही बदल केले तर त्याचा खूप मोठा फरक पडतो आणि लग्न जुळण्याची शक्यता वाढते. पण त्यापूर्वी संपूर्ण वास्तुचे परीक्षण करून त्यातील दोष जाणून घेणे हे आवश्यकच ठरते.
          विवाह जुळणे हा एक भाग आहे आणि त्यापुढचा भाग आहे विवाह टिकणे. विवाह न टिकणे हा आजच्या काळातील जटिल प्रश्न बनला आहे. नवरा=बायकोमध्ये न पटणे किंवा कुटुंबियांमध्ये सतत वाद होऊन लग्न मोडणे ही जणू आजच्या काळातील फॅशन झाली आहे. आणि हे प्रमाण सुशिक्षित कुटुंबात वाढल्याने परिस्थिती जास्त गंभीर झाली आहे. केवळ आणि केवळ वास्तुदोषामुळे असे प्रकार घडत असतात हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झालं आहे. लग्नापूर्वी एकमेकांवर प्रेम करणारं जोडपं अचानक एकमेकांना का नकोसं होतं याचा विचार झालाच पाहिजे. नवरा बायकोची झोपण्याची खोली, घरातील स्वयंपाकघर, बैठक ते अगदी शौचालय जर चुकीच्या ठिकाणी बांधलं गेलं असेल तर असे प्रकार घडत असतात.
आपण ज्या वास्तूत राहत असतो ती प्रत्यक्षपणे आपल्यावर प्रभाव पाडत असते. विविध दिशांनी येणार्‍या ऊर्जा व त्यातून निर्माण होणारी कंपने त्या वास्तूत राहणार्‍या माणसाच्या आरोग्य व मनावर परिणाम करत असतातच. त्यानुसारच माणूस प्रतिक्रिया देत असतो आणि वागत असतो ज्यातून स्वभावगुण ठरतो. हा स्वभावगुण किंवा त्यात असणारे दोष हेच तर नातेसंबंध निर्माण करतात आणि संपुष्टातही आणतात. त्या ववास्तूत सकारात्मक बदल करून दोष कमी होतील आणि गुणांची तीव्रता कशी वाढवता याबद्दल वास्तुशास्त्र तज्ञ मदत करू शकतात.
शेवटी विवाहयोग म्हणजे तरी काय असतो! तर आपल्याला सुख मिळवून देणारा साथीदार लाभणे. तो शोधता आला पाहिजे आणि त्याच्यासोबतचं नातं टिकवता आलं पाहिजे. वास्तुशास्त्र यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतं हे लक्षात ठेवले पाहिजे.